गणपती बाप्पा आपल्या गावाला पोहचले सुद्धा आणि नवरात्रीचा उत्सव उंबरठ्यावर आला सुद्धा. आता दुर्गा मातेची पूजा सुरू होईल आणि त्या सोबत सुरू होईल सलग ९ दिवस एका लयीत, एका तालात जल्लोष, म्हणजेच गरबा स्त्री, पुरुष, लहान, मोठे सगळे एकत्र येऊन गाण्याच्या लयीवर थिरकतात, गाण्याच्या सुरुवातीला हळूहळू आणि मग गाणं संपेपर्यंत गरबा रंगात येतो. त्यामुळे गरबा करणाऱ्यांपेक्षा तो पाहणाऱ्यांना पण आणखी मज्जा येते. पण हे असं अद्भुत नृत्य अस्तित्वात कसं आलं? म्हणजेच गरब्याची सुरुवात कशी झाली? आणि गरबा नवरात्रीत का खेळला जातो? हे जाणून घेऊया. (Garba History)
गरबा या लोकनृत्याची सुरुवात गुजरातमध्ये झाली. गुजरातच्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये सणवाराला लोकं एकत्र येऊन गरबा खेळायचे. पण पौराणिक कथानुसार महिषासुर जो अत्यंत शक्तीशाली राक्षस होता. ज्याला ब्रम्हदेवाचं वरदान होतं की, तो कोणत्याही देव, दानव आणि माणूस यांच्या हातून मरणार नाही. याच वरदानाचा फायदा घेत स्वर्गात राहणाऱ्या देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे सगळे देवता भगवान विष्णुंकडे पोहचले आणि मदतीची मागणी केली. तेव्हा महिषासुराचा वध ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांची शक्ती असलेली दुर्गा माता करेल हे निश्चित झालं. ९ दिवसांच्या युद्धानंतर दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला. त्यामुळे देवीचे आभार आणि तिची पूजा करण्यासाठी गरबा हे नृत्य केलं जाऊ लागलं. (Social News)
गरबा गोलाकारात खेळला जातो. असं म्हटलं जातं हा वर्तुळाकार जीवनाचं चक्र दर्शवतो. तसं बघायला गेलं तर वर्तुळाला सुरुवात किंवा शेवट नसतो. जीवन, जगणं आणि मृत्यू हे सतत चालणारं चक्र आहे. त्याचच प्रतिबिंब गरब्याचं हे वर्तुळ करतं. या वर्तुळाच्या मधोमध दुर्गा मातेची मूर्ती किंवा फोटो असतो आणि त्याच्याभोवती गरबा केला जातो. ताली गरबा, त्रान ताली गरबा आणि दांडिया असे गरब्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण गरबा हा फक्त नवरात्रीतच केला जातो असं नाहीये. (Garba History)
गरबा हा स्त्रीत्वाचा सन्मान करण्यासाठी सुद्धा केला जातो. गरबा हा शब्द संस्कृत शब्द गर्भ पासून निर्माण झाला आहे. पूर्वी जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिकपाळी येते तेव्हा हे नृत्य करून तो क्षण साजरा केला जायचा. आता केला जातो की नाही माहिती नाही. स्त्रीमध्ये असणाऱ्या मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी गरबा खेळला जायचा. गरबा खेळण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे घातले जातात ज्याला चनिया चोली म्हणतात हे तुम्हाला माहिती असेल. पण गुजरातच्या अहमदाबादमध्ये असणाऱ्या साडू माता नि पोल मध्ये पुरुष महिलांसारखी साडी परिधान करून गरबा खेळतात. त्यांची मान्यता अशी आहे की, देवी ज्यांच्या इच्छा पूर्ण करते ते पुरुष अशाप्रकारे गरबा खेळतात. (Social News)
======
हे देखील वाचा : अयोध्येत पुन्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा
======
सुरुवातीला गुजरातच्या खेडेगावांमध्ये स्वत: पारंपारिक गाणं गाऊन हे नृत्य केलं जायचं. काळ बदलत गेला आणि गुजरातच्या छोट्या गावांमधून हे नृत्य भारतभर लोकप्रिय झालं. यूनेसकोच्या अमृत सांस्कृतिक वारश्याच्या यादीत भारताच्या गरब्याचा सुद्धा समावेश आहे. गरबा या नृत्यामागे इतकी मोठी परंपरा आणि इतिहास आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. (Garba History)