पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली आहेत. त्यातून सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तरसणार आहे. तर भारतातील जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या राज्यांची पाणी संकटापासून सुटका होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः राजस्थानमधील वाळवंटी भागाला या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून राजस्थानमधील काही जिल्हे हे कोरडे जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आले होते. आता याच कोरड्या जिल्ह्यातील जमिनीमधून सोनं पिकवण्याची आशा येथील शेतक-यांना वाटू लागली आहे. सिंधू पाणी कराराला स्थगिती दिल्यामुळे राजस्थानचे भाग्य बदलणार असून काही वर्षात वाळवंटी राजस्थानचे हिरव्यागार राजस्थानमध्ये रुपांतर होईल, अशी आशाही येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. (Rajasthan)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 मध्ये झालेला सिंधू पाणी करार स्थगित कऱण्यात आला. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर राजस्थानमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. सिंधू करारानुसार भारताचा पूर्वेकडील रावी, बियास, सतलज या नद्यांवर पूर्ण ताबा होता. पश्चिमेकडील सिंधू, झेलम, चिनाब या नद्यांचे 80 टक्के पाणी हे पाकिस्तानला जात होते. आता हा करार स्थगित झाल्यामुळे जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. यापूर्वी चिनाब आणि झेलम नद्यांवर असलेल्या सलाल, बगलिहार आणि पाकल दुल या जलविद्युत प्रकल्पांवर पाकिस्ताननं आक्षेप घेतला होता. आता या प्रकल्पातून वीज निर्मिती वाढवण्यात येणार असून पाण्याचा शेती सिंचनासाठी वापर होणार आहे. सोबतच रावी आणि सतलज नद्यांवर अवलंबून असलेला पंजाबमध्येही कृषी उत्पादकता वाढणार आहे. हिमाचल प्रदेशातील बियास आणि सतलजवर बांधलेल्या भाक्रा आणि पोंग धरणांचा पूर्ण क्षमतेनं वापर करण्यात येईल.
या सर्वात वाळवंटी राजस्थानला सर्वात मोठा फायदा होणार आहे. (Rajasthan)
पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी राजस्थानकडे वळवले तर राजस्थानचा पश्चिमेकडील कोरडा भाग हिरवा आणि समृद्ध होणार आहे. पाकिस्तानकडे जाणारे पाणी हरिके येथून वळवून इंदिरा गांधी कालव्याद्वारे कोरड्या भागात पाठवण्यात येणार आहे. पंजाबमधून दरवर्षी 6000 क्युसेक पाणी ओव्हरफ्लो होऊन पाकिस्तानला जाते. हेच पाणी फीडर आणि कालवे दुरुस्त केले तर राजस्थानमधील शेतीला सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. केंद्रसरकारही याबाबत योजना आखत आहे. आयजीएनपीच्या सुधारणा आणि विस्तारासाठी सरकारने मोठा निधी मंजूर केला असून कालवे सुधारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. (Rajasthan)
त्यामुळे या कालव्याद्वारे पाणी आल्यावर पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर, बारमेर, बिकानेर हे वाळवंटी जिल्हे समृद्ध होणार आहेत. यासंदर्भात पश्चिम राजस्थानमधील ओसियानचे आमदार भेरा राम सोल यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्रही पाठवले आहे. त्यात पाकिस्तानात जाण्यापासून रोखलेल्या चिनाब, झेलम, रावी, बियास, सतलज आणि घग्गर नद्यांचे पाणी पश्चिम राजस्थानमध्ये कालवा प्रकल्प तयार करून वळवावे अशी मागणीही कऱण्यात आली आहे. पश्चिम राजस्थानमध्ये पाण्याची मोठी कमतरता असते. येथील लोक पिण्याच्या पाण्यासाठीह अनेक किलोमीटर पायपीट करतात. शेतीसाठी तर येथे फार कमी पाणी उपलब्ध असते. त्यामुळेच या भागातील शेतक-यांना आता सिंधू पाणी करार स्थगित झाल्यामुळे आनंद झाला आहे. (Rajasthan)
=================
हे देखील वाचा : Mock Drill : देशात होणाऱ्या मॉक ड्रिलची इत्यंभूत माहिती
==================
पश्चिम राजस्थान हा वाळवंटी भाग आहे. येथील वाळूचे छोटे छोटे ढिगारे दूरवरुन दिसतात. पाण्याच्या अभावामुळे येथे झाडेही नाहीत. चिनाब, झेलम, रावी, बियास, सतलज आणि घग्गर नद्यांचे पाणी या पश्चिम राजस्थानमध्ये आणले तर भविष्यात हा परिसर हिरवागार करु असे येथील शेतक-यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे. या भागात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाल्यावर या भागाचा विकास अधिक वेगानं होईल, अशी आशाही शेतक-यांनी व्यक्त केली आहे. जोधपूर, फलोदी, बारमेर, जैसलमेर, बालोत्रा, जालोर, सिरोही, पाली, नागौर, दिडवाना, कुचामन, बिकानेर, गंगानगर, हनुमानगड या भागातील शेतक-यांनी पश्चिम राजस्थान कालवा प्रकल्प पूर्ण ताकदीने सुरू करण्याची मागणी केली आहे. स्वातंत्र्यापूर्वी, बिकानेर कालवा हुसैनीवाला येथून वाहत असे. हा कालवा महाराजा गंगा सिंह यांनी बांधला होता. आता दरवर्षी जून-जुलै-ऑगस्टमध्ये हुसैनीवाला मार्गे सरासरी 1.30 एमएएफ पाणी पाकिस्तानला जाते. त्यामुळे पाकिस्तानमध्ये शेकडो हेक्टर जमिनीवर शेती केली जाते. हेच पाणी या कालव्यामार्गे पश्चिम राजस्थानला वळवाले अशीही मागणी शेतकरी करीत आहेत.
सई बने