सनातन धर्मात चार धाम यात्रा खूप महत्त्वाची मानली जाते. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार धामांची यात्रा वेद आणि पुराणांमध्ये खूप शुभ मानली जाते. गेल्या काही वर्षापासून या चारधाम यात्रेसाठी जाणा-या भाविकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यात तरुण वर्गाचा अधिक भरणा आहे. शिवाय परदेशातूनही मोठ्या संख्येनं भाविका चारधाम यात्रेसाठी येतात. भाविकांची वाढती संख्या पाहता उत्तराखंडमधील या चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येते. आता मे महिन्यापासून ही चारधाम यात्रा सुरु होणार आहे. 2025 वर्षाच्या या चारधाम यात्रेसाठी उत्तराखंड सरकारनं ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी सुरु होत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या चारधाम यात्रेची वाट पाहणा-या लाखो भाविकांमध्ये आनंद व्यक्त झाला आहे. (Uttarakhand)
उत्तराखंड चारधाम यात्रा व्यवस्थापन आणि यात्रा नियंत्रण व्यवस्थापनानं 2025 वर्षाच्या चारधाम यात्रेची तयारी सुरू केली आहे. या यात्रेला गेल्या काही वर्षात मोठी गर्दी होते. ही गर्दी नियंत्रीत करण्यासाठी पुढील आठवड्यापासून ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी सुरु करण्यात येणार आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मार्गावर भाविकांना येणा-या अडचणी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे येणारे अडथळे दूर सारण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. ही सर्व तयारी 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट उत्तराखंड सरकारनं ठेवलं आहे. चारधाम यात्रेच्या नोंदणीसाठी उत्तराखंड सरकारची अधिकृत वेबसाइट आहे. (Latest News)
https://registrationandtouristcare.uk.gov.in ला भाविकांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. चारधाम यात्रेसाठी यावर्षी 60 टक्के भाविकांची नोंदणी ऑनलाईन होणार आहे. तर 40 टक्के भाविक ऑफलाइन नोंदणी करु शकणार आहेत. ऑफलाइन नोंदणीसाठी हरिद्वार, ऋषिकेश आणि ऋषिकूल येथे प्रत्येकी 20 काउंटर आणि विकास नगर येथे 15 काउंटर उपलब्ध आहेत. या यात्रेला येणा-या भाविकांची संख्या वाढल्यावर हिना, पांडुकेश्वर, सोनप्रयाग आणि बधकोट येथेही नोंदणी काऊंटर बनवण्याच्या विचारात यात्रा प्रशासन आहे. (Uttarakhand)
या चारधाम यात्रेमध्ये सुरुवातीला बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे 2025 रोजी उघडण्यात येतील. याशिवाय गंगोत्री, केदारनाथ आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्याची तारीख महाशिवरात्री आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर केली जाणार आहे. भाविकांची वाढती संख्या पाहता हरिद्वार आणि ऋषिकेश व्यतिरिक्त, विकासनगर, बारकोट, उत्तरकाशी, श्रीनगर आणि कीर्तीनगर येथेही भाविकांच्या विश्रांतीसाठी निवासस्थाने उभारण्यात येत आहेत. यामध्ये भाविकांना आवश्यक अशा सर्व सुविधा उपलब्ध असतील. ही चारधाम यात्रा सुरळीत पार पाडावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. यावेळी सुमारे 10 किलोमीटर अंतरानं एक विशेष पोलीस पथक असणार आहे. चारधाम यात्रेचा हा प्रवास हरिद्वारपासून सुरु होतो. लाखो भाविक हरिद्वारला गंगा स्नानानं ही पवित्र यात्रा सुरु करतात. या सर्व भाविकांच्या सोयीसाठी आता गंगा काठावर अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. त्यानंतर भाविक यमुनेच्या पवित्र स्थानाकडे जातात. त्यानंतर केदारनाथ आणि बद्रीविशाल अशा स्वरुपाचा भाविकांचा प्रवास होतो. (Latest News)
=============
हे देखील वाचा : Prayagraj : महाकुंभमधील धर्म संसदेकडे देशाचे लक्ष
Interstellar : आपण ‘ब्लॅक होल’मध्ये जिवंत राहू शकतो का ?
=============
या संपूर्ण यात्रेला किमान 10 दिवसांचा कालावधी लागतो. गेल्या काही वर्षात या यात्रेला मिळणा-या भाविकांच्या भरभरुन प्रतिसादामुळे या यात्रामार्गावरील बहुतांश गावांना मोठी आर्थिक मदत होत आहे. या यात्रामार्गावर अनेक दुकाने आणि निवासस्थाने स्थानिक उपलब्ध करत आहेत. यामध्ये या भागातील तरुणांनी रोजगार निर्माण केला आहे. या यात्रेनिमित्त अनेक हौशी पर्यटकही उत्तराखंडमध्ये येतात. या पर्यटकांना प्रशिक्षित गाईडची गरज लागले. यात उत्तराखंडमधील तरुण पुढे असून सोशल मिडियाच्या माध्यमातून हे तरुण, यात्रेकरु आणि पर्यटकांसोबत संवाद साधत आहेत. त्यामुळेही या चारधाम यात्रेसाठी येणा-या भाविकांची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी 15 लाखांहून अधिक भाविकांनी यमुनोत्री गंगोत्री धामला भेट दिल्याची माहिती आहे. रोज या पवित्र धामला साधारण 10 हजार भाविक येत होते. यावेळी हा आकडा अधिक होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. त्यामुळेच प्रशासनानं अनेक स्थानिक तरुणांना हाताशी घेत यात्रा नियोजन सुरु केले आहे. (Uttarakhand)
सई बने