ज्या शोची मागील अनेक महिन्यांपासून प्रेक्षक वाट बघत होते तो बिग बॉसचा शो अखेर दणक्यात सुरु झाला. बिग बॉसच्या या पाचव्या पर्वामध्ये अनेक नामचीन आणि अतिशय नावाजलेल्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे. शो सुरु होऊन एक आठवडा देखील होत नाही तोपर्यंत घरात भांडणांचे बिगुल वाजले आहे. पहिल्याच आठवड्यात या शोमध्ये निक्की तांबोळी आणि दिग्गज मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
निक्कीने पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत वर्षा उसगांवकरांचा उल्लेख “काळ्या मनाच्या मॅम, ब्लॅक हार्टेड” असा केला होता. यामुळे देखील तिच्यावर आता जोरदार टीका केली जात आहे. निक्कीला बोलण्याचे तारतम्य नसल्याचे देखील अनेकांनी सांगितले आहे.
वर्षाजी आणि निक्की या दोघींमध्ये झालेले भांडण तुफान गाजत आहे. या भांडणांमध्ये तिने वर्षा यांना अनेक अपशब्द देखील वापरले. सोबतच “मराठी लोकांची मानसिकता अशी असल्याने मी या शोमध्ये येत नव्हते” हे वाक्य देखील म्हटले. वर्षा यांनी अनेक दशकं मराठी इंडस्ट्री गाजवली असून, आज देखील त्यांची लोकप्रियता आणि त्यांचे फॅन्स कायम आहेत.
वर्षा यांच्यावर केलेल्या विविध विधानांमुळे आणि त्यांच्यासोबत निक्कीचे वागणे पाहून अनेकांनी वर्षा यांना पाठिंबा दिला आहे. निक्कीने वर्षा यांना बोलल्यानंतर प्रेक्षकांसोबतच कलाकारांनी देखील सोशल मीडियावरून निक्कीला खडेबोल सुनावले आहे. याशिवाय तिच्या मराठी लोकांच्या मानसिकतेच्या वाक्यावरूनही तिची शाळा घेतली जात आहे.
View this post on Instagram
अशातच मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेखा कुडची यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी वर्षा यांना पाठिंबा देताना महाराष्ट्राबद्दल आणि मराठी लोकांच्या अस्मितेबद्दल देखील काही बाबी अधोरेखित केल्या आहेत.
सुरेखा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “बिग बॉस मराठी सीझन ५ …
खूप आतुरतेने वाट पहाट होते… वर्षा ताई आणि पॅडीला पाहून मनापासून आनंद झाला…
पण, काही स्पर्धक मराठी असून मराठी लोकांच्या मानसिकतेवर बोलतात… तेव्हा वाईट वाटतं… मी स्वतः साऊथची आहे माझी भाषा कन्नड आहे पण, मला ओळख दिली या महाराष्ट्राने… आपल्या महाराष्ट्रात कलाकारांवर प्रेम करणारे त्यांचा आदर करणारे प्रेक्षक आहेत… असं असताना आज ‘बिग बॉस’च्या घरात काही जण आपल्या वयापेक्षा पेक्षा दुप्पट असलेल्या, एक काळ मराठी चित्रपट इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा ताईंचा जेव्हा अपमान करतात तेव्हा वाईट वाटतं…
मान्य आहे त्या घरात सगळे सारखे आहेत सगळे स्पर्धक आहेत पण, तरीही बोलताना वयाचं भान राखणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ३ महिन्यांचा खेळ संपला की, शेवटी तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हेच पाहिलं जातं…
आणखी एक नवल म्हणजे आता कुठे एक मलिका संपवून आलेले कलाकार जेव्हा आपल्या सिनियरला पाण्यात पाहतात… त्यांच्यावर हसतात तेव्हा हे सगळं पाहून लाज वाटते
असो वर्षा ताई उभा महाराष्ट्र तुमचा बाजूने उभा आहे!”
=======
हे देखील वाचा : अंकिता वालावलकरची खास व्यक्तीसाठी पोस्ट
======
दरम्यान सुरेखा यांच्या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्स करत सुरेखा यांना पाठिंबा देत, त्यांच्या मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दल असलेल्या प्रेमाचे कौतुक केले आहे. सोबतच सुरेखा यांच्या या पोस्टला योग्य सांगत निक्कीला घरातून बाहेर काढण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे. याआधी वर्षा यांना पाठिंबा देण्यासाठी जय दुधाणे, पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदे आदी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.