मराठी बिग बॉस सध्या चांगलेच रंगात आले आहे. सदस्यांमध्ये सतत विविध कारणांवरून भांडणं होताना दिसत आहे. बिग बॉसमधील भांडणं दिवसागणिक वाढत असून निक्की आणि तिच्या ग्रुपने पहिल्या दिवसापासूनच वर्षा उसगांवकर यांना टार्गेट केल्याचे दिसत आहे. शो सुरु होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. पहिल्या आठवड्यात निक्कीने वर्षा उसगांवकर यांना अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला होता.
या नंतर रितेश देशमुखने भाऊंच्या धक्क्यावर तिची चांगलीच खरडपट्टी काढली आणि तिला समज देत वर्षाजी यांची माफी मागायला लावली. त्यानंतर निक्की शांत झाली. मात्र तिची मैत्रीण आणि ग्रुप मेंबर असलेल्या जान्हवीने तिची उणीव भरून काढली. तिने या आठवड्यामध्ये वर्षा यांच्याशी जोरदार भांडण केले आणि त्यांचा अपमान केला. हे सर्व पाहून महाराष्ट्राच्या जनतेने आणि कलाकारांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल करत घरातून बाहेर काढण्याची मागणी केली. रितेश देशमुखने याबाबत योग्य न्याय करावा असे देखील सांगितले.
रितेश देशमुखने देखील अपेक्षेप्रमाणे जान्हवीला भाऊंच्या धक्क्यावर खडेबोल सुनावले. या आठवड्यामध्ये जान्हवीने वर्षा यांचा केलेला अपमान आणि अभिजितला एक वाक्य म्हटले, “हातात बांगड्या भर’ यावरून रितेश खूपच चिडला होता. रितेश देशमुखने आधी जान्हवीला वर्षा उसगांवकरांच्या पुरस्कारांवरून केलेल्या वक्तव्याबद्दल जाब विचारला. यानंतर जान्हवी एका भांडणात अभिजीतला “हातात बांगड्या भर” म्हणाली होती. यावरून देखील रितेशने तिला खडेबोल सुनावले आहेत.
मात्र यानंतर शोमध्ये असे काहीतरी घडले की सगळ्यांनाच त्याचा धक्का बसला. रितेशने जान्हवीशी बोलताना तिचे एक वक्तव्यं सगळ्यांसमोर आणले. निक्की आणि जान्हवी पहिल्या दिवसापासून मैत्रिणी झाल्या. एकाच गटात असूनही आता त्यांच्यात मतभेद होताना दिसत आहे. याबाबतच जान्हवी एक दिवस वैभवला सांगत होती की, “मला हे लोक नाही आवडत. सगळे चुकीचं वागत आहेत, खोटं वागत आहेत. आपण गोष्टी करतोय आणि निक्की क्रेडिट घेऊन जातेय. आपलं प्लॅनिंग चुकीचं आहे. निक्कीच्या डोक्यात पण ही गोष्ट आली नव्हती”
======
हे देखील वाचा : जान्हवीने केला वर्षा उसगांवकरांचा अपमान
======
आधी जान्हवी ती हे बोलली हे मान्यच करत नव्हती. मग रितेश चिडला आणि म्हणाला, “जान्हवी नीट ऐका…मी जे बोलतोय ते खरं बोलतोय… तुम्ही सोफ्यावर बसून लिव्हिंग एरियामध्ये बोलत होता. सगळं आपण करतोय आणि क्रेडिट निक्की घेऊन जाते.” हे ऐकून निक्कीला पण धक्का बसतो.
त्यानंतर बेडरूममध्ये येऊन जान्हवी हुंदके देत जोरजोरात रडू लागते. तेव्हा तिथे धनंजय व छोटा पुढारी येतात आणि जान्हवीला पाणी देतात. मात्र तिला तिथेच अचानक चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. तेव्हा घरातील सर्व सदस्य धावत मदतीला पुढे येतात. अरबाज तिला उचलून कन्फेशन रूममध्ये नेताना प्रोमोमध्ये दिसला. यापुढेचे सर्व आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे.