उज्जैनच्या क्षिप्रा नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या भुखी माता मंदिरात नवरात्रानिमित्त भाविकांची गर्दी होत आहे. सम्राट विक्रमादित्यांनी उभारलेल्या या मंदिरात दोन देवी विराजमान आहेत. या दोघी बहिणी असल्याचे मंदिराचे पुजारी सांगतात. त्यापैकी एक भुकेली आई आणि दुसरी धुमावती आई म्हणून ओळखली जाते. या मंदिराला भुवनेश्वरी भुखी माता मंदिर( Bhukhi Mata Temple) असेही म्हणतात.
उज्जैनमधील क्षिप्रा नदिच्या काठी असलेल्या भुखी माता मंदिराचा संबंध थेट सम्राट विक्रमादित्यांबरोबर सांगण्यात येतो. सम्राट विक्रमादित्य राजा म्हणून जनतेची किती आणि कशी काळजी घ्यायचे हे सांगताना या मंदिराचा उल्लेख करावाच लागतो. एका आख्यायिकेनुसार त्याकाळी यज्ञ झाल्यावर तरुणाचा बळी दिला जात असे. यज्ञ झाल्यावर देवीला बळी देण्यासाठी एका तरुणाला निवडण्यात आले. त्या तरुणाच्या आईनं सम्राट विक्रमादित्याला विनंती करुन आपल्या मुलाला वाचवण्याची विनंती केली. त्यावर राजानं त्या तरुणाच्या ऐवजी स्वतःच यज्ञाच्या ठिकाणी जाण्याचा आणि बळी जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्या तरुणाच्या आईला सांगितले.
विक्रमाने संपूर्ण शहर सुवासिक पदार्थ आणि स्वादिष्ट मिठाईने सजवण्याचा आदेश दिला. विविध ठिकाणी छप्पन भोगांची सजावट करण्यात आली होती. या छप्पन भोगांमुळे विक्रमादित्याला खाण्याआधीच भुकेल्या मातेची भूक शमली ( Bhukhi Mata Temple) . विक्रमादित्यने विविध प्रकारचे पदार्थ आणि मिठाई बनवली आणि त्यांना जेवणात सजवले. मग एका सिंहासनावर मिठाईने बनवलेल्या माणसाचा पुतळा ठेवला.
रात्री देवी भोजनासाठी आल्या आणि त्या भोजनाने प्रसन्न होऊन निघून गेल्या. मात्र पुन्हा देवींना कुतूहल वाटले की, हे सर्व कोणी केले, तेव्हा विक्रमादित्य सिंहासनाखालून बाहेर आले आणि त्यांनी देवीला नमस्कार केला. देवीने आनंदित होऊन वरदान मागितले, तेव्हा विक्रमादित्याने सांगितले की, तुम्ही कोणत्याही मनुष्याचा बळी घेऊ नये आणि कृपया नदीच्या पलीकडे राहा. शहरात कधीही प्रवेश करू नका. देवीने राजाच्या बुद्धीवर प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले.
विक्रमादित्याने नदीच्या पलीकडे त्यांच्यासाठी मंदिर बांधले. यानंतर देवीने कधीही मानवी बळी घेतला नाही आणि उज्जैनच्या लोकांना त्रास दिला नाही. तेव्हापासून या क्षीप्रा नदिच्या काठावर देवीचे वास्तव्य असून देवी भक्तांची मनोकामना पूर्ण करते असे सांगितले जाते. हेच ते भुखी माता मंदिर ( Bhukhi Mata Temple) असल्याचे सांगण्यात येते. आता या मंदिरात देवीला मुगाच्या डाळीचा खास नैवेद्य दिला जातो. सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या मंदिरात भक्तांची गर्दी असते. आता नवरात्रीनिमित्त या मंदिरासमोरील दिपमाळीही प्रज्वलीत करण्यात आल्या आहेत.
========
हे देखील वाचा : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग मधील फरक काय?
========
मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते पौर्णिमा या कालावधीत भुखी माता मंदिरात विशेष पूजा होते. यावेळी मातेला मुगाचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे. त्यावेळी गुर्जर गौर ब्राह्मण समाजातील कुटुंबे मंदिरात येतात आणि देवीला गुळ घातलेला मुगाचा गोड पदार्थ अर्पण करतात. यावेळी मंदिर परिसरात मोठी जत्राही भरते. देवीला विविध नैवेद्य अर्पण केले जातात. देवी तृप्त झाल्यास मनोकामना पूर्ण होते अशी येथे येणाऱ्या भाविकांची धारणा आहे. या मंदिरातली दोन्ही देवी या बहिणी आहेत. या मंदिराला भुवनेश्वरी भुखी माता मंदिर ( Bhukhi Mata Temple) असेही म्हणतात.
आता ही देवी शाकाहारी पदार्थ अर्पण केल्याने प्रसन्न होते, असे भाविक सांगतात. त्यामुळे देवी मंदिर परिसरात भक्त येतात आणि तिथेच देवीसाठी गोडाचा पदार्थ बनवतात. हा पदार्थ गरम गरम देवीला अर्पण करतात. त्यामुळे देवी खूष होते, असे भाविक सांगतात. मंदिरात दोन दीपस्तंभ असून त्यावर नवरात्रात दिवे लावले जातात. नवरात्रात अष्टमीला पूजेनंतर विशेष उत्सव करण्यात येतो. मंदिराच्या आतील बाजूस एक मोठा सिंह असून देवीचे आसन म्हणून भाविक त्याची पूजा करतात. नवरात्रात या मंदिरात अखंड ज्योत लावण्यासाठीही मोठ्या संख्येने भाविक येतात. नवरात्रीमध्ये या मंदिरात सकाळ-संध्याकाळी ढोल-ताशांच्या गजरात होणारी आरती भाविकांसाठी आणखी एक श्रद्धेचे स्थान आहे. या आरतीच्यावेळी ढोल ताशांच्या गजरानं हे सर्व वातावरण भाविकांना मोहित करते. यादरम्यान प्रत्यक्ष देवीचा वावर मंदिरात असतो, अशी भाविकांची धारणा आहे. आता या नवरात्रात भक्तांनी मंदिरात देवीदर्शनासाठी गर्दी केली आहे.
– सई बने