सोशल मिडियावर महिला बलुच आत्मघातकी बॉम्बरचे व्हिडिओ सर्वाधिक शेअर होत आहेत. सलवार कमीज घातलेल्या आणि पाठीवर बॅग घेतलेल्या या बलुच महिलांच्या हाती अत्याधुनिक बंदुका आहेत. त्यातून त्या आपल्या विरोधकांना मारण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवण्यात येत आहे. मात्र हे लक्षात घ्यायला हवे की, बलुच महिला या आत्ताच आत्मघातकी बॉम्बर होत नाहीत, तर स्वतंत्र बलुच मोहीम जेव्हा सुरु झाली, तेव्हापासूनच महिलांचा यातील सहभाग हा लक्षणीय आहे. शारी बलुच, सुमैया कलंदरानी बलुच, महल बलुच, महिकन बलुच आणि तरंग माहो अशा आत्मघातकी महिलांची नावं गेल्या चार वर्षापासून गाजत आहेत. ( Baloch Women )

या महिला आपल्या जीवावर उदार होऊन मारण्यासाठी आणि मरण्यासाठी का तयार झाल्या, हे ही जाणून घेणे गरजेचे आहे. गेली अनेक वर्ष या बलुच महिलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर पाकिस्तानी लष्कराकडून अनेक अत्याचार केले जात आहेत. हजारो बलुच महिलांवर बलात्कार करुन त्यांना मारण्यात आले आहे. काही महिलांच्या समोरुन त्यांच्या मुलांना पळवून नेण्यात आले आहे. याला विरोध केल्यास या महिलांनाही पाकिस्तानी सैनिकांनी गोळ्या घातल्या आहेत. म्हणून पाकिस्तान विरोधात जी बलुच आर्मी स्थापन झाली, त्यात बलुच महिलांचा सहभाग हा सुरुवातीपासूनच मोठा होता. सुरुवातीला या महिला पाकिस्तान सैन्याशी लढतांना जखमी झालेल्या बलुच जवानांवर उपचार करणे, त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे, अशा स्वरुपाची कामे करत होत्या.
मात्र नव्या बलुच पिढीमध्ये पाकिस्तानबाबतची आक्रमकता वाढत चालली आहे, त्यांनी पाकिस्तानी सैन्याची क्रूरता पाहिली आहे. त्यामुळेच या सैन्याविरोधात हाती शस्त्र घेऊन या महिला मरण्यासाठीही तयार झाल्या आहेत. पाकिस्तानी सैन्य आणि बलुच लिबरेशन आर्मी, बलुच लिबरेशन फ्रंट यांच्यामध्ये होत असलेल्या हिंसक घटना वाढल्या आहेत. बुलच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानमधील काही प्रांतावर आपला झेंडा लावला असल्याचीही माहिती आहे. या सर्वात या बलुच आर्मीमधील महिलांची चर्चा होऊ लागली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावलू अनेक बुलच तरुणी स्वतंत्र बलुचीस्तानची मागणी करत आहेत, आणि त्यासाठी हाती शस्त्र घेऊन सज्ज झाल्या आहेत. बलुच बंडखोरांमध्ये महिला आत्मघातकी बॉम्बर्सची वाढती संख्या आश्चर्यकारक आहे. ( Baloch Women )
यासर्वामागे अनेक वर्षांचे राजकीय दुर्लक्ष, आर्थिक दुर्लक्ष आणि महिंलावर झालेले अत्याचार आहेत. पाकिस्तान सरकार बलुचिस्तानच्या वायू, खनिज आणि सागरी संसाधनांचा फायदा घेत असले तरी त्याचा बलुचिस्तानमधील जनतेला काहीही फायदा होत नाही. उलट या खनिज खाणींमध्ये बलुच तरुणांना जबरदस्तीनं काम करावं लागतं. त्यात त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचे मृतदेहही त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचवण्यात येत नाहीत. या खाणी परिसरातील रस्त्यांवर अशा दुर्दैवी तरुणांचे मृतदेह अनेकवेळा आढळून आले आहेत. या सर्वाविरोधात बलुच नागरिकांमध्ये आक्रोश वाढत होता. त्यातूनच बलुच आर्मीमध्ये महिलांची संख्या वाढू लागली. यातील बहुतांशी महिला या आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आत्मघातकी बॉम्बर्स झाल्या आहेत.
या महिला जीवावर किती उदार झाल्या आहेत, याचे उदाहरण नोश्की येथील आयएसआय मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यातून येते. यात मारल्या गेलेल्या १८ बीएलए लढाऊंपैकी ११ महिला होत्या. बलुची आर्मीमध्ये सुरुवातील सर्व सूत्रे पुरषांच्या हाती होती. मात्र २०२२ नंतर महिलांनाही त्यात सहभागी करुन घेण्यात आले. पुरुषांप्रमाणे त्यांनाही प्रशिक्षण देऊन थेट आघाडीवर तैनात करण्यात आले. पूर्वी याच महिला राजकीय संदेश पसरवणे, निधी उभारणे, सैनिकांच्या कुटुंबांना मदत करणे आणि मानवी हक्क चळवळींमध्ये भाग घेणे यातून बलुच आर्मीला मदत करत होत्या. आता त्यांच्याच पुढच्या पिढीनं हाती बंदुका घेत नवा अध्याय लिहायला सुरुवात केली आहे. या महिला आत्मघातकी सेनेतील आदर्श शारी बलुच ठरली आहे. शारीनं एप्रिल २०२२ मध्ये तिचा पहिला आत्मघाती हल्ला केला. तिने कराची विद्यापीठातील कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूटवर हल्ला केला, यात चिनी नागरिकांचा मृत्यू झाला. शारी बलुच ही ३० वर्षांची होती. प्राणीशास्त्रात एमएससी आणि एमफिल करत असलेली शारी दोन मुलांची आईही होती. ( Baloch Women )
=======
हे देखील वाचा : Ayatollah Khamenei : त्यांच्या गर्भाशयालाही सोडले नाही…
=======
यातनंतर सुमैया कलंदरानी बलुच, जरीना रफिक उर्फ तरंग माहो या महिलांनी पाकिस्तानी सैन्याची मोठी हानी केली आहे. बलुच आर्मीनं आता या महिला आत्मघातकी बॉम्बरसाठी नवी मजीद ब्रिगडे स्थापन केली आहे. या सर्वातून बलुच आर्मीचे एकच उद्दीष्ट आहे, ते म्हणजे, स्वतंत्र बलुचिस्तानची स्थापना. पाकव्याप्त बलुचिस्तान पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ४४ टक्के भाग व्यापतो. सांख्यिकीयदृष्ट्या, हे क्षेत्रफळ ३४७,१९० चौरस किलोमीटर आहे, जे भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे. सध्यातरी पाकिस्तानचा सर्वात गरीब प्रांत म्हणून बलुचिस्तानचा उल्लेख होतो. वास्तविक येथे मिळणा-या खनिजांमुळे पाकिस्तानची तिजोरी भरलेली आहे. पण त्या सुविधांचा वा पैशाचा कुठलाही फायदा बलुचिस्तानच्या जनतेला होत नाही. जर बलुच आर्मी स्वतंत्र बलुचिस्तान करण्यात यशस्वी ठरली तर या नव्य देशाच्या व्यवस्थेत महिलांचा समावेश मोठा असणार आहे. ( Baloch Women )
सई बने
