हिंदू धर्मामध्ये ऋतुमानानुसार सण येतात आणि ते तसेच साजरे केले जातात. त्यातीलच प्रमुख वसंत पंचमीचा सण उत्साहात साजरा झाला. प्रत्येक राज्यामध्ये हा सण साजरा कऱण्याची पद्धत वेगळी आहे. या सर्वामध्ये अवधनगरीची वसंत पंचमी ही खास असते. अवधनगरी म्हणजे, अयोध्येत वसंत पंचमीपासून रामलल्लांची होळी सुरु झाली. येथे प्रभू रामचंद्रांना अबीर आणि गुलाल अर्पण करण्यात आला. आता वसंत पंचमीपासून पुढचे चाळीस दिवस प्रभू श्रीरामांची होळी साजरी होणार आहे. यानिमित्त प्रभू श्रीरामांना सोन्याचा काठ असलेले बनारसी कपडे घालण्यात आले होते. (Ayodhya)
वसंत पंचमीचा सण हा देशभरात वेगवेगळ्या स्वरुपात साजरा करण्यात आला. या दिवशी बहुतांश ठिकाणी माता सरस्वतीची पूजा कऱण्यात येते. तिर्थराज प्रयाग येथे सुरु असलेल्या महाकुंभमद्ये याच दिवसाचे औचित्य साधत करोडो भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. या वसंत पंचमीला अयोध्या आणि वृंदावनमध्ये होळीची सुरुवात म्हणून पाहिले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केले जाते. त्यानंतर दुस-या दिवशी रंग उडवले जातात. यावर्षी धूलिवंदन 14 मार्च रोजी साजरे होणार आहे. या धूलिवंदनाची सुरुवात अयोध्या आणि वृंदावन या नगरीमध्ये वसंत पंचमीच्या मुहूर्तावर करण्यात आली आहे. भगवान रामाच्या अयोध्येत याचा उल्लेख अवध होळी असा करण्यात येतो. ही अवध होळी सुमारे 40 दिवस खेळली जाते. (Social News)
वसंत पंचमीच्या दिवशी अयोध्येतील सर्वच मठ आणि मंदिरांमध्ये मोठी साजवट कऱण्यात आली होती. गेली अनेक वर्ष या मंदिरांमध्ये वसंत पंचमीचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. वसंत पंचमीपासून, अयोध्येतील सर्वच मंदिरे आणि मठांमध्ये देवांना गुलाल लावला जातो. माहितीनुसार अयोध्येत 10 हजार मंदिरे आणि मठ आहेत. या सर्वांमध्ये वसंत पंचमीपासून रंगाच्या महोत्सवाची, म्हणजेच धुलिवंदनाची सुरुवात करण्यात आली आहे. अयोध्येप्रमाणे वसंत पंचमीचा दिवस वृदांवन आणि मथुरा या कृष्णनगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वृंदावन आणि मथुरा येथील होळीची अनेक भाविक वाट पहात असतात. (Ayodhya)
या होळीची सुरुवात वसंत पंचमीपासून होते. पुढील चाळीस दिवस, हे या दोन्ही ठिकाणी उत्साहाचे वातावरण असणार आहेत. येथील बांकेबिहारी मंदिरात ठाकूरजी वसंत पंचमीपासूनच भक्तांसोबत होळी खेळतात. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर या बांकेबिहारी मंदिरात हजारो भक्तांनी रंगाचा उत्सव साजरा केला. याची सुरुवात गोस्वामी ठाकूरजींच्या गालावर गुलाल लावून झाली. त्यानंतर झालेल्या आरतीनंतर भक्तांवर गुलालचा वर्षाव करण्यात आला. राधावल्लभ मंदिरांमध्ये वसंत पंचमीनिमित्त फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती. वृंदावनच्या राधावल्लभ मंदिरात हजारो भाविकांचा मेळा जमला असतांना मथुरेच्या प्राचीन शाहजी मंदिरातही भाविकांनी गर्दी केली होती. वर्षातून फक्त वसंत पंचमीलाच या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले कऱण्यात येतात. येथेही वसंत पंचमीपासून पुढचे चाळीस दिवस देवाची रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. (Social News)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Women Footballers In Bangladesh : आमचा काय दोष !
===============
पश्चिम बंगालमध्ये, वसंत पंचमीचा दिवस हा माता सरस्वतीच्या पूजनाचा दिवस असतो. येथील शाळांमध्ये सरस्वती पूजन करण्यात आले. पिवळे वस्त्र धारण करुन विद्यार्थिनींनी देवी सरस्वतीची पुजा केली. येथे अनेक ठिकाणी मोठ्या मंडपात देवी सरस्वतीच्या मूर्ती उभारण्यात आल्या होत्या. स्थानिक कराकारांनी देवीचे स्तुतीगीत सादर केले. अनेक ठिकाणी बंगाली वर्णमाला शिकण्यासाठी ‘हाते खोरी’ हा समारंभ देखील करण्यात आला. उत्सवांसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी भगवान रघुनाथांची भव्य अशी रथयात्रा काढण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथून निघालेल्या या रथयात्रेत मोठ्या संख्येनं भाविक सामिल झाले होते. अयोध्येप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्येही वसंत पंचमीच्या दिवसापासून धुलिवंदनाची सुरुवात होते. उत्तराखंडमध्येही वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करण्यात आली. शिवाय भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा करत स्थानिकांनी हा सण साजरा केला. वसंत पंचमीच्या दिवशी पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये पतंग उडवण्याच्या स्पर्धा घेतल्या गेल्या. अशापद्धतीनं देशभरात वसंत पंचमीचा सण साजरा करण्यात आला. (Ayodhya)
सई बने