ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत. गुरुवारी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरसद्वारे यंत्रणांचा तालुकानिहाय आढावा घेतला.
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि इतर विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नव्याने कृती आराखडा तयार केला आहे. या कृती आराखड्याच्या तात्काळ अंमलबजावणी करण्या संदर्भांत त्यांनी यंत्रणांना सूचना दिल्या.
असा असणार आराखडा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून करोनामुक्तीसाठी जिल्हा परिषदेने कृती आराखडा तयार केला आहे. या आरखाडयानुसार कोणती कामे किती दिवसात करायची हे देखील निश्चित करण्यात आले आहे. शिवाय कामानुसार प्रत्येक अधिकाऱ्याला कामाची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. या आराखड्यानुसार एका बाधित रुग्णांच्या संपर्कातील १५ जणांचा शोध घेणे, त्यांना अलगीकरण कक्षात दाखल करणे. जास्तीत जास्त सहवासितांना शोधणे तसेच त्यांची आरटीपीसीआर किंवा अँटीजीन डिटेक्शन किटद्वारे तपासणी करून रुग्णांचा शोध घेणे. याकामाची जबाबदारी ही तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलेली आहे.
अधिकाधिक अलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी काम पाहायचे असून प्रत्येक तालुकानिहाय नेमण्यात आलेल्या संपर्क अधिकाऱ्यांनी देखील तालुक्याला भेट देऊन कामाचा आढावा जलदगतीने घेण्याच्या सूचना श्री.सोनवणे यांनी दिल्या आहेत. जास्तीत जास्त रुग्णांना दाखल करता यावे यासाठी सीसीसी कार्यान्वित करण्याचे कामही आराखड्यात असून या कामाची मुदत १० दिवस आहे. सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असलेल्या क्षेत्रात किंवा प्रतिबंधित क्षेत्रात फिव्हर क्लिनिक तसेच अँटीजन डिटेक्शन सुविधा कार्यान्वित करण्याचेही सूचना असून हे काम दहा दिवस करायचे आहे. याशिवाय सर्वाधिक रुग्ण असलेल्या कार्यक्षेत्रात स्थिर अथवा मोबाईल व्हॅनद्वारे फिव्हर क्लिनिक उघडणे, तापाच्या तसेच इन्फ्लुएंझा लाईक इलनेस रुग्णांची तपासणी करण्यात यावी असेही या कृती आराखड्यात काम आहे. या कृती आराखड्यानुसार तात्काळ उपाययोजना करून करोना नियंत्रणात आणण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी सांगितले.
कोरोनामुक्त गावात लागणार हिरवा झेंडा
गेल्या २८ दिवसात एकही करोनाबाधित रुग्ण नसलेल्या अशा ग्राम पंचायतीच्या क्षेत्रात तसेच गावात हिरवा झेंडा लावण्यात येणार आहे. तसेच करोना प्रतिबंधित करण्याविषयी जनजागृती करणे, खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना क्वारंटाईन सेंटर, फिव्हर क्लिनिक, अँटीजन टेस्टिंग साईट याठिकाणी सेवा देण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.