महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीत फूट पडल्याचे वृत्त आहे, तर दुसरीकडे भाजप सक्रिय झाला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यासोबतच अनेक अपक्ष आणि छोटे पक्षही भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. एका मंत्र्याने तर काँग्रेसचे २५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
राज ठाकरे- गडकरी भेट
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभेत राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे काही आमदार राज ठाकरेंच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे आपले राजकीय मैदान मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, भाजपची शिवसेनेसोबतची २५ वर्षांपूर्वीची युती दोन वर्षांपूर्वी तुटली. अशा परिस्थितीत भाजप महाराष्ट्रातील छोट्या पक्षांना आपल्यासोबत जोडू शकते. तर यामध्ये राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठी भूमिका बजावू शकते.
काँग्रेसचे २५ आमदार उद्धव सरकारवर नाराज
एकीकडे भाजप नवीन मित्रपक्षांच्या शोधात आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे २५ आमदार आघाडी सरकारवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. या आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने तर असे म्हटले आहे की, मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात कामे राबविण्याच्या आमदारांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले, तर निवडणुकीत पक्षाची चांगली कामगिरी कशी होईल?
=================================================================
हे देखील वाचा: सुयोग्य नेतृत्वाअभावी काँग्रेस रसातळाला जाणार?
=================================================================
दरम्यान, महाविकास आघाडीचे (एमव्हीए) २५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला, हे त्यांनी सांगितले नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये दुर्लक्ष केल्यामुळे हे सर्व नेते नाराज असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.
शिवसेना- राष्ट्रवादीमध्येही वाद
असे नाही की, महाविकास आघाडीत केवळ काँग्रेसचेच नेते नाराज आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही नाराज आहेत. शिवसैनिकांची ही नाराजी त्यांच्या मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आहे.
आता २२ मार्च २०२२ रोजी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दावा केला की, महाराष्ट्र सरकारमध्ये सर्वात जास्त लाभार्थी पक्ष शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. शिवसेना नेतृत्व करत असूनही भेदभावाला सामोरे जात असल्याचे ते म्हणाले. असाच आरोप शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनीही केला आहे. युतीतील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याच्या या बातम्या भाजपच्या हालचाली देखील वाढवत आहेत.