Home » Congress Downfall : ‘शस्त्रक्रिया की उत्तरक्रिया’ काँग्रेसपुढे दोनच पर्याय !

Congress Downfall : ‘शस्त्रक्रिया की उत्तरक्रिया’ काँग्रेसपुढे दोनच पर्याय !

by Team Gajawaja
0 comment
Congress Downfall
Share

मध्यंतरी युट्यूबवर एका प्रख्यात स्तंभलेखिकेची मुलाखत आली होती. ही मुलाखत बिहार निवडणुकीपूर्वीची होती. राहुल गांधींनी नुकतीच ‘वोटर अधिकार यात्रा’ बिहारमध्ये पूर्ण केली होती आणि सदर स्तंभलेखिका त्या यात्रेला झालेल्या गर्दीमुळे प्रचंड भारावून गेल्या होत्या. त्या गर्दीत स्थानिक बिहारी जनता किती होती आणि बाहेरील राज्यातून आलेले भाडोत्री लोक किती होते हा प्रश्न त्यांना अजिबात पडला नव्हता. त्यांनी निर्वाळा देऊन टाकला की या यात्रेनंतर राहुल हे निर्विवादपणे पंतप्रधान मोदी यांचे देशातील एकमेव पर्याय म्हणून पुढे आले आहेत. एवढ्या प्रथित यश पत्रकार जर जमणाऱ्या गर्दीवरून निष्कर्ष काढत असतील, तर काँग्रेसची’इको सिस्टिम’ किती आंधळी व बहिरी झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी अधिक पुरावे देण्याची गरज भासू नये. सत्ताधारी पक्षाला पर्याय लोकसभेतील संख्याबलावर अवलंबून असतो हे या प्रथित यश राजकीय विश्लेषक महिलेला माहित नसावं का? ( Congress Downfall ) 

Rahul Gandhi and Sonia Gandhi

Rahul Gandhi and Sonia Gandhi

राहुल यांना पंतप्रधान करण्याची घाई झालेल्या काँग्रेसी इको सिस्टिमने आज काँग्रेस पक्षाची दुरावस्था कशी व किती झाली आहे, त्याचा अभ्यास करणे गरजेचे वाटते. सध्याच्या घडीला काँग्रेस देशातील ३ राज्यात स्वबलावर सत्तेत आहे. ही राज्ये आहेत कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा. या तीन राज्यात मिळून लोकसभेच्या जागा आहेत ४९. त्यातील काँग्रेसकडे जागा आहेत १९. हिमाचल मध्ये काँग्रेसकडे एकही जागा नाही. उरलेल्या ३० जागा भाजपकडे आहेत. झारखंड, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर या ३ राज्यात काँग्रेस प्रादेशिक पक्षांचे शेपूट धरून सत्तारूढ आघाडीत आहे. या ३ राज्यात मिळून काँग्रेसकडे लोकसभेच्या जेमतेम १० जागा आहेत.

मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, त्रिपुरा या राज्यातून काँग्रेसचा एकही खासदार नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे १९८४ च्या निवडणुकीनंतर गेल्या ४२ वर्षात काँग्रेसला एकदाही स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. किंबहुना गेल्या तीन सलग लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १०० चा आकडाही पार करू शकलेली नाही. आता विविध राज्यातील विधानसभामधील काँग्रेसची स्थिती काय आहे ते बघू. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, दिल्ली, नागालँड, त्रिपुरा या राज्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. उत्तर प्रदेशमध्ये २/४०३, बिहारमध्ये ६ /२४३ महाराष्ट्रात १६ /२८८तर गुजरात मध्ये १७/१८२ आमदार आहेत. गोव्यात निवडून आलेल्या सर्व आमदारांनी पक्षांतर केले आहे. ( Congress Downfall ) 

२००३ नंतर काँग्रेसचे एकही सरकार पहिल्या टर्म नंतर परत निवडून आलेले नाही. अपवाद फक्त दिल्लीचा! तिथे शिला दीक्षित लागोपाठ तीन वेळा मुख्य मंत्री झाल्या. २०१३ मध्ये त्यांचा पराभव झाल्यावर दिल्लीतून काँग्रेसचा पाया इतका उखडला गेला आहे की गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ‘भोपळा’ मिळवण्याची हॅट ट्रिक केली आहे. कर्नाटक, राजस्थान, पंजाब, छत्तीसगड या राज्यातील सरकारे सलग दुसऱ्यांदा निवडून येऊ शकलेली नाहीत.सध्या अस्तित्वात असलेली हिमाचल प्रदेश व कर्नाटक सरकारे आपली मुदत तरी पूर्ण करतील का, याची शंका वाटते इतकी गटबाजी दोन्ही राज्यात आहे.

Congress Downfall

Mallikarjun Kharge and Rahul Gandhi

उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, यासारख्या महत्वाच्या राज्यातून काँग्रेस सत्तेतून हद्दपार झाल्याला आता जवळजवळ चार दशकांचा काळ लोटला आहे पण त्यानंतर एकदाही काँग्रेस परत सत्तेत येऊ शकलेली नाही. या सर्व राज्यात काँग्रेसची संघटना पूर्णपणे मोडकळीस आली आहे. तामिळनाडूत तर काँग्रेसची सत्ता जाऊन ६० वर्षें होत आली आहेत आणि कधी अण्णा द्रमुक तर कधी द्रमुक पक्षाचे बोट धरून काँग्रेस कशीबशी तग धरून आहे. संघटनात्मक पातळीवर तर आनंदी आनंदच आहे. अनेक राज्यात काँग्रेसचे अस्तित्व जाणवत सुद्धा नाही. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काम केलेल्या एका व्यक्तीने सांगितले की काँग्रेसचे बूथ एजन्ट्स, पोलिंग एजन्ट्स यांना आपले काय काम असते याची कुठलीही कल्पना नव्हती. EVMचे टेस्ट रन्स कसे चेक करायचे हेसुद्धा त्यांना माहित नव्हते. बहुतेक पोलिंग एजन्ट्स मतमोजणी पूर्ण व्हायच्या आतच निघून गेले होते. अशी सगळी परिस्थिती असताना राहुल गांधी कुठल्या तोंडाने निवडणूक प्रक्रियेवर, निवडणूक आयोगावर आरोप करतात ते समजत नाही. ( Congress Downfall ) 

मध्यंतरी काँग्रेसने गावागावात ‘वोट चोर, गद्दी छोड आंदोलन केले. यात नागरिकांचे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. चार टेबले मांडून काँग्रेस कार्यकर्ते बसलेले दिसले पण एकही सामान्य नागरिक स्वाक्षरी करताना दिसत नव्हता. दुसऱ्या दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांचे तेवढे फोटो छापून आले. असले निरर्थक अभियान राबवण्याऐवजी काँग्रेसने मतदार नोंदणी मोहिम हाती घेतली असती तर काही फायदा झाला असता. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये परस्पर विसंवाद तर इतका आढळतो की आपण एका विनोदी नाटकाचा प्रयोग पहात आहोत की काय असे वाटते. राहुल गांधी वोटचोरीचा आरोप निवडणूक आयोगावर करतात, तर अशोक गहलोत म्हणतात वोट चोरी म्हणजे महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून त्यांची मते विकत घेणे .नेता कुठल्या अर्थाने वोट चोरी म्हणतो ते इतरांना समजलेले सुद्धा नाही असे या दाखल्यावरून दिसते.

=======

हे देखील वाचा : BJP-Congress : भाजप सर्वशक्तिशाली तरीही काँग्रेस नेते का हवेत?

=======

बिहारचे निकाल लागल्यावर राहुल गांधी वोट चोरी झाली म्हणून प्रेस कॉन्फरेन्स घेत असताना, बिहारमधील काँग्रेस पुढारी मान्य करत होते की आमच्याकडे पैसे घेऊन तिकिटे वाटली, संघटन दुबळे होते, गटबाजी होती म्हणून काँग्रेसचा धुव्वा उडाला. पी. चिदंबरम तर काँग्रेसच्या दुर्दशेबद्दल मतदारांनाच जबाबदार धरतात. काँग्रेसमध्ये नवीन रक्ताला वाव मिळताना दिसतो का? गेली २५ वर्षें तेच तेच चेहरे आपण संसदेत बघत आहोत. आता काँग्रेसची कार्यकारिणी म्हणजे वृद्धाश्रम झाला आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रोज सकाळ संध्याकाळ मोदी व भाजपावर गरळ ओकून काहीही साध्य होणार नाही. उलट पक्षी मोदी व भाजप हे काँग्रेसमुळे दिवसभर प्रसिद्धीच्या झोतात राहतात. यामुळेच भाजप नेते खुले आम सांगतात की राहुल गांधी हे आमचे स्टार प्रचारक आहेत. ( Congress Downfall ) 

त्यातच आता दिग्विजय सिंगनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटन शक्तीचे कौतुक करताना थेट नरेंद्र मोदींचे उदाहरण दिले आहे. त्यावरून गदारोळ माजला आहे. एवढी सगळी अंदाधुंदी असताना सुद्धा काँग्रेस आपला वोट शेअर टिकवून आहे ही केवळ काँग्रेसच्या पूर्वासुरिंची पुण्याई आहे. आता काँग्रेस जर टिकवायची आणि वाढवायची असेल तर वरपासून खालपर्यंत छाटणी करण्याची गरज आहे तरच नवीन पालवी फुटू शकेल. एखाद्या माणसाचा जीव वाचवायचा असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते त्याप्रमाणे काँग्रेसला वाचवायचे असेल तर कठोर शस्त्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. परिवाराच्या बाहेर डोकावून एखाद्या नव्या दमाच्या नेतृत्वाला वाव देऊन पुढे आणले पाहिजे तरच काँग्रेसमध्ये नवीन सळसळते रक्त वाहू लागेल. अन्यथा पानं गळून फक्त फ़ांद्या उरलेल्या जीर्ण शिर्ण वृक्षासारखी पक्षाची अवस्था होईल. देशाला आज एका समर्थ, विधायक, समतोल विचाराच्या राष्ट्रव्यापी विरोधी पक्षाची गरज आहे. आता निर्णय काँग्रेसजनांनी घ्यायचा आहे. त्यांना शस्त्रक्रिया करून काँग्रेस पक्ष जगवायचा आहे की त्याची उत्तरक्रिया करून काँग्रेसच्या नावाने अंघोळ करायची आहे.

– रघुनंदन भागवत


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.