Home » दोघांची ‘मैत्री’ आणि तिसऱ्याचा लाभ !

दोघांची ‘मैत्री’ आणि तिसऱ्याचा लाभ !

by Team Gajawaja
0 comment
eknath shinde, raj thackeray, devendra fadnavis and uddhav thackeray
Share

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर मुगल बादशाह औरंगजेबला वाटले की आता त्याला दख्खन विजयाचे आपले स्वप्न सहज साकार करता येईल. त्या अपेक्षेने त्याने दिल्ली सोडून मराठ्यांच्या मुलखात तळ ठोकला. पण प्रथम छत्रपती संभाजी महाराजांनी कडवा प्रतिकार करून औरंगजेबचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करून सुद्धा औरंगजेबजचे मराठा साम्राज्य उध्वस्त करण्याचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत कारण राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई यांनी तलवार हाती घेतली आणि मराठेशाहीचे रक्षण केले. आपल्या आयुष्याच्या अखेरीस औरंगजेबला कळून चुकले की त्याचे स्वप्न अधुरे राहाणार आहे. कपटी औरंगजेबने अखेरची खेळी खेळली. त्याच्या ताब्यात असलेले संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांना आपल्या कैदेतून सोडून द्यायचा आदेश त्याने दिला. त्याचा अंदाज होता की शाहू महाराज परतल्यावर छत्रपतींच्या गादीवरून ताराबाई व शाहू महाराज यांच्यात संघर्ष होईल व त्यापायी मराठेशाही आपोआप बुडेल. औरंगजेबचा अर्धा अंदाज बरोबर ठरला कारण शाहू महाराज व ताराबाई यांच्यात जरूर सत्तासंघर्ष पेटला पण मराठेशाही काही नष्ट झाली नाही कारण पेशव्यानी शाहू महाराजांना साथ दिली.

आज वरील इतिहासाची आठवण होण्याचे कारण म्हणजे येऊ घातलेली मुंबई महापालिकेची निवडणूक व त्यासाठी झालेली ‘ठाकरे’ बंधूची युती.

Maharashtra Politics

राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत सांगितले की राज व उद्धव यांना एकत्र आणणे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही ते काम देवेंद्र फडणवीसांनी केले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला समर्थन दिले होते. त्यानंतरही त्यांचे सारखे तळ्यात मळ्यात चालू होते. पण राजकारणात चाणाक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राजना महायुतीत सामावून घेण्याचे टाळले. एकाकी लढून काही यश मिळत नाही हे पाहून राज ‘मित्र ‘ शोधू लागले आणि त्यांना समदुःखी असलेल्या आपल्या चुलत भावाच्या रूपाने एक ‘सखा ‘ गवसला. (१८ वर्षाच्या दुराव्या नंतर). दोघांचीही अवस्था ‘दो बेचारे बिना सहारे’ अशी झाली असल्याने त्यांनी लगेचच एकमेकांना टाळी दिली.

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणुकीत चमत्कार घडवणार असे पतंग मीडिया मध्ये उडू लागले. सगळं अवकाश या दोन ‘ठाकऱ्यांच्या युतीनेच व्यापून गेले. अशातच महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि आपण काय बघत आहोत?

दोन्ही भावांची कागदोपत्री युती झाली तरी त्यांच्या अनुयायांमध्ये मनोमिलन झालेले नाही. उबाठा सेनेने नवनिर्माण सेनेला फक्त ५० च्या आसपास जागा देऊन त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. नवनिर्माण सेनेच्या काही नेत्यांनी जागा वाटपावरून जाहीर रित्या नाराजी व्यक्त केली आहे. तिकीट वाटपावरून दोन्ही पक्षात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे.’हमारे अंगनेमे तुम्हारा क्या काम है? असे हे पक्ष परस्परांना विचारत आहेत कारण दोन्ही पक्षांना जागा वाटपात आपापल्या हक्काच्या जागांवर पाणी सोडावे लागले आहे. प्रचंड रडारड सुरु झाली आहे. त्यातच परस्परांच्या उमेदवारांना हरवण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत, त्याही टीव्ही च्या कॅमेऱ्यासमोर. या नाराजीपायी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपली मते मित्र पक्षाला देण्याऐवजी शिंदेच्या शिवसेनेकडे वळवू शकतात.एकूण काय उबाठा व नवनिर्माण सेना महायुतीचा पतंग काटण्यापेक्षा परस्परांचेच पतंग काटण्याच्या तयारीत आहेत असे दिसते.

काही नाराज इच्छुक सरळ एकनाथ शिंदेच्या कळपात सामील होत आहेत. ९० जागा लढवणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला तर हा एक बोनसच मिळाल्यासारखा आहे कारण त्यांच्याकडे ९० जागा लढवण्यासाठी पुरेसे उमेदवारच नाहीत. यामुळे नवनिर्माण सेनेला व उबाठाला खिंडार पडले आहे.उबाठा सेनेचे अनेक माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेला जाऊन मिळाले आहेत. हे शिवसैनिक ठाकरे बंधूना त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देणार आहेत.

Raj Thackeray and Uddhav Thackeray

मराठ्यांच्या इतिहासात लढाया भले मुगल वा आदिलशाह अथवा निजाम यांच्याबरोबर झाल्या असतील पण दोन्ही बाजूनी रणभूमीवर लढणारे कोण होते तर ते मराठेच होते. आता अशीच स्थिती काही मतदारसंघात होणार आहे. सर्वच उमेदवार हे मूळ शिवसैनिकच असणार आहेत आणि ते परस्परविरुद्ध लढणार आहेत.

मराठी मते फुटू नयेत म्हणून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूना हा मोठा धक्काच आहे कारण त्यांच्या एकीला सेंध मारणारे शिंदेही मराठीच आहेत आणि मूळ बाळासाहेबांच्या शिवसेनेतीलच आहेत. त्यांच्याबद्दल सहानुभूती असलेला एक वर्ग उबाठा सेना व नवनिर्माण सेनेत सुप्त रित्या असू शकेल. त्यातच ते राज्यात सत्तेत आहेत आणि त्यांची वोट बँक ही’मराठी मतदार हीच आहे. अशा स्थितीत मराठी मतदार हा ‘बंधू प्रेमापेक्षा’ सत्ता प्रेमाला महत्व देण्याची जास्त शक्यता आहे.

राजशी जवळीक साधल्याने काँग्रेसने ‘उबाठाचा’ हात सोडून दिला आहे त्यामुळे उद्धवना मुस्लिम मतांची शाश्वती उरलेली नाही. तसेच राज यांच्या उत्तर भारतीयांवरील ‘अति प्रेमामुळे’ राज उद्धव जोडीला धडा शिकवण्यासाठी उत्तर भारतीय त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची संभावना अधिक आहे. त्यातच मराठी मतदारांना एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ‘तिसरा मराठी पर्याय’ निर्माण झाल्याने मराठी मतांची हक्काची वोट बँक विभाजित झाली आहे.

थोडक्यात ठाकरे बंधूनी एकत्र येणे हे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ ठरले आहे. त्यात फायदा होणार आहे एकनाथ शिंदे व महायुतीला, असं आपण म्हणू शकतो.

‘फडणवीस यांनी वरील सर्व घटनांचा आधीच अंदाज आल्याने तर त्यांनी राजला’उबाठाच्या’ गोटात सोडले नसेल ना? राज हे आपल्या बाजूला असण्यापेक्षा विरोधात गेले तर आपल्याला अधिक फायदेशीर ठरतील असा आडाखा त्यांनी आधीच बांधला असावा कारण उबाठाच्या ताब्यातून मुंबई महापालिका खेचून घेण्यासाठी राजनी उबाठाचा पाया खिळखिळा करावा ही रणनीती कशावरून नसेल? मराठीत म्हण आहे की’दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’. पण सध्या मात्र मुंबईत दोघांची मैत्री तिसऱ्याचा लाभ अशी स्थिती झाली आहे हे उपरोक्त विवेचनावरून लक्षात येईल.

– रघुनंदन भागवत


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.