काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट, संध्याकाळची वेळ होती पंजाबमधल्या लुधियाना रेल्वे स्टेशनवर गजबज चालली होती. कर्मचारी आपापलं काम करत होते, प्रवासी गडबडीत होते. तेवढ्यात एक साधा शेतकरी, संपूर्ण सिंह, आपल्या वकिलासोबत स्टेशनवर आला. आणि त्याने डायरेक्ट स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसवर ताबा घेतला. हा ताबा म्हणजे इंडियन रेल्वेचा त्याने घेतलेला बदला होता. तुम्ही म्हणाल त्याला पोलिसांनी वगैरे अडवलं नाही का? तर त्याला कोणीच अडवू शकत नव्हतं. इंडियन रेल्वेला त्या शेतकऱ्यासमोर झुकावं लागलं होतं. पण कसं आणि का? काय आहे हे संपूर्ण प्रकरण. जाणून घेऊ. (Sampoorna Singh)
पंजाबमधील लुधियानाजवळील कटाणा गावात राहणारा संपूर्ण सिंग हा एक साधा शेतकरी. त्याचं आयुष्य म्हणजे शेती, मेहनत आणि कुटुंब. २००७ साली पंजाबमध्ये इंडियन रेल्वेने लुधियाना ते चंदीगढ रेल्वे लाईनचं काम सुरू झालं. त्यासाठी रेल्वेने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी यात होत्या त्यात संपूर्ण सिंग या शेतकऱ्याची सुद्धा जमीन होती आणि रेल्वेने त्याच्या जमिनीचा भाव त्याला एका एकरामागे २५ लाख रुपये दिला. संपूर्ण सिंग सुरुवातीला खुश होता, पण काही दिवसांनी त्याला कळालं की शेजारच्या गावात शेतकऱ्यांना त्याच जमिनीसाठी ७१ लाख रुपये प्रति एकर मिळाले. हे कळल्यावर संपूर्णचा संताप अन् टेंशन वाढलं. त्याला फसवणूक झाल्यासारखं वाटलं. या भेदभावामुळे त्याने थेट इंडियन रेल्वेला कोर्टात खेचलं.
२०१२ मध्ये त्याने इंडियन रेल्वे विरोधात कोर्टात केस दाखल केली. “शेजारच्या गावातील शेतकऱ्याप्रमाणेच माझ्या जमिनीला मोबदला मिळायला हवा” अशी मागणी त्याने कोर्टात केली. कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला आणि रेल्वेला प्रति एकर ५० लाख रुपये देण्याचे आदेश दिले. एकूण १.४७ कोटी रुपये संपूर्णला मिळायला हवे होते, पण रेल्वेने काय केलं? त्याला फक्त 42 लाख रुपये दिले आणि बाकीचे 1.05 कोटी रुपये रखडवले. संपूर्णने इंडियन रेल्वे पैसे देईल अशी आशा ठेवत वाट पहिली पण रेल्वे आपले पैसे बुडवतेच आहे, हे पाहून संपूर्णने त्याने २०१५ मध्ये पुन्हा रेल्वे विरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली.(Sampoorna Singh)
मग दोन वर्ष सुरू राहिलं तारीख पे तारीख… आणि २०१७ मध्ये, लुधियाना कोर्टाचे डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स जज जसपाल वर्मा यांनी एक अभूतपूर्व निकाल दिला. ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. इंडियन रेल्वेच्या तर गाडी खालचे रूळ सरकले. त्यांनी आदेश दिला की, रेल्वेने पैसे न दिल्यामुळे दिल्ली-अमृतसर स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस आणि लुधियाना स्टेशनच्या स्टेशन मास्तरच्या कार्यालयाची जप्ती केली!
संपूर्ण सिंग, एक साधा शेतकरी, स्वर्ण शताब्दी या ट्रेनचा मालिक बनला ! १५ मार्च २०१७ रोजी, संपूर्ण आणि त्याचा वकील राकेश गांधी कोर्टाच्या आदेशासह लुधियाना स्टेशनवर पोहोचले. संध्याकाळी ६:५५ वाजता स्वर्ण शताब्दी स्टेशनवर आली, तेव्हा त्यांनी ट्रेनच्या ड्रायव्हरला कोर्टाचा आदेश दाखवला आणि त्या ट्रेनचा ताबा घेतला. स्टेशनवर सगळे अवाक् झाले. प्रवासी, रेल्वे कर्मचारी, सगळे विचार करत होते, “हा शेतकरी आहे तरी कोण, जो थेट ट्रेनच जप्त करायला आलाय?” पण संपूर्णने ट्रेन थांबवली नाही, कारण त्याला प्रवाशांना त्रास द्यायचा नव्हता. तो त्याचा फक्त हक्क मागत होता.(Sampoorna Singh)
================
हे देखील वाचा : Virginity Test : इथे लग्नाआधी ‘मुलाची’ Virginity चेक होते !
================
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कोर्टाच्या अधिकाऱ्यांमार्फत ट्रेन सोडवली पण ती कोर्टाच्या ताब्यातच होती, रेल्वेने कोर्टाला सांगितलं की त्यांनी ७३.९० लाख रुपये जमा केले आहेत, पण संपूर्णला अजूनही पूर्ण १.०५ कोटी रुपये मिळाले नव्हते. कोर्टाने रेल्वेला २५ एप्रिल २०१७ पर्यंत पैसे देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली, नाहीतर ट्रेनचा लिलाव होऊ शकतो, असा इशारा दिला. पण पुढे काय झालं? याची माहिती कुठेच उपलब्ध नाही, काही मीडियारिपोर्ट नुसार संपूर्ण सिंगची केस आजही कोर्टात सुरू आहे. पण ही घटना इतकी अनोखी आहे की, एक सामान्य शेतकरी, जो आपल्या हक्कासाठी लढला, त्याने रेल्वेसारख्या संस्थेला आव्हान दिलं. आणि काही वेळेसाठी का असेना, तो एका ट्रेनचा मालक बनला! तुम्हाला हा किस्सा कसा वाटला?