२८ एप्रिल १८१९ ! ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. त्यांना शिकार करायची होती. अशातच शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने एका वाघाला गुहेमध्ये जाताना पाहिल. त्याने त्याचा पाठलाग केला. हळूहळू त्याच्या पाठोपाठ जॉन स्मिथ या गुहेत पोहोचला. पण आत गेल्यावर त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. वाघ बाजूला राहिला, पण तो समोरच्या गोष्टी बघूनच चाट पडला. हो तो अजिंठा लेण्यांकडे पाहत होता. अजिंठ्याच्या लेणी क्र. १० ची दर्शनीभागाची सूर्यकमान त्याच्या नजरेस पडली. हीच होती अजिंठा लेणीच्या शोधाची सुरुवात. तोपर्यंत हा अमूल्य ठेवा जगाच्या दृष्टीने अज्ञात होता. जवळपास दीड हजार वर्ष तो अज्ञात राहिला. स्थानिकांना या लेण्यांची माहिती होती पण महत्त्व कळल नव्हत. याच अजिंठा लेण्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊ. (Ajanta Caves)
केवळ छिन्नी-हाथोड्यावर जगातील सर्वात सुंदर गोष्ट निर्माण करता येते, हे ज्याच्याकडे पाहून समजत ती म्हणजे अजिंठा लेणी ! महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे जिथे ५ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. याशिवाय आपल्या एकट्या महाराष्ट्रात तब्बल ७०० लेण्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अजिंठा लेणी ! महाराष्ट्रातल्या छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्यात या अजिंठ्याच्या 30 गुहा आहेत. 1500 वर्ष जुन्या या गुहांमध्ये बौद्धकालीन जबरदस्त चित्र आहेत आणि त्या चित्रांइतकाच किंबहुना त्यापेक्षाही रंजक आहे त्याच्या निर्मितीमागचा इतिहास ! (Top Stories)
इतिहासकारांच्या मते पावसाच पाणी दगडांमधून खाली येताना पाहूनच सातवाहन साम्राज्याच्या राजांना गुहा बनवण्याचा विचार आला असावा. इ.स.पूर्व २०० ते 300 या काळात बौद्ध धर्माचा तिथे प्रसार झाला आणि याच काळात तिथे पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटांनी बुद्धाला समर्पित लेणी खोदायला सुरुवात केली. याचं श्रेय वाकाटकांनाही जातं. दरम्यान फक्त अजिंठाच नव्हे तर नाशिक, कण्हेरी अशा ठिकाणीसुद्धा या काळात लेण्या बनवल्या गेल्या. सातवाहन काळात लेणी क्रमांक ८, ९, १०, १२, १३, १५ च खोदकाम झाल. पुढे पाचशे वर्ष काम बंद पडल. पुन्हा पाचव्या शतकात गुप्त, वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी तिथल्या लेणींच खोदकाम केल. वाकाटक काळात लेणी क्रमांक १, २, १६, १७, १९ च खोदकाम झाल. इ.स.पूर्व दोनशे ते इ.स. सातशे म्हणजे सुमारे नऊशे वर्षांच्या कालखंडात कलाकारांच्या किमान ३० पिढ्या तिथे अखंड राबल्या असतील. कित्येकांचा जन्म आणि कित्येकांच्या मृत्यूचा साक्षीदार असतील ह्या अजिंठ्याच्या गुहा! पण त्यातल्या एकाचही नाव इतिहासात सापडत नाही. इतकी वर्ष ही लेणी अज्ञात राहिली. कारण बौद्ध धर्म पगडा कमी झाल्यानंतर इथे वस्ती नव्हती. घनदाट जंगलामुळे ती लेणी झाकली गेली आणि पुढे मुस्लिम राजवटीतही अज्ञात राहिली. (Ajanta Caves)
आता मगाशी सांगितल्याप्रमाणे १८१९ साली जॉन स्मिथने या लेण्यांचा शोध लावला खरा पण हा शोध लागल्यानंतर पुढे २४ वर्षे तिथे काहीच काम झाल नाही; पण ब्रिटिशांच्या कामाच्या पद्धतीनुसर यावर अहवाल तयार झाला. त्यावर अभ्यास केला गेला. पुढे १८४४ साली ईस्ट इंडिया कंपनीने कॅप्टन रॉबर्ट गिलची नियुक्ती अजिंठ्यावर केली. गिल हा सैनिकगडी असला तरी मोठा चित्रकार होता. एका अर्थाने अजिंठ्याच्या कलेला पारखी मिळाला. त्याने लेणीची अवस्था पाहिली. झाड-झुडुप, वटवाघळांची वस्ती, वानरांचा वावर. त्याने एक एक गुहा स्वच्छ करायला सुरुवात केली, एक एक खजिना त्याच्यापुढे उघडायला लागला आणि त्याने त्या चित्रांची प्रतिकृती काढायला सुरुवात केली. अजिंठ्याच्या या निसर्ग सौंदर्यात रॉबर्ट रमला. ‘पारू’ नावाच्या भिल्ल स्त्रीवर रॉबर्ट मोहित झाला. त्याने तिच्याशी लग्नही केल.(Top Stories)
==============
हे देखील वाचा : Dalai Lama : ३० वर्षांपूर्वी गायब झालेला Monk अजूनही जिवंत?
==============
१८५६ साली पारू मरण पावली. पुढे या दोघांची प्रेमकहाणी अजिंठ्याचा अविभाज्य भाग झाली. पारूच्या समाधीवर गिलने लिहीलेला ‘टू द मेमरी ऑफ पारू हू डाईड ऑन २३ मे १८५६’ हा संदेश आजही तिथे आढळतो. ‘पारू’ गेली आणि रॉबर्टच्या हातातला ब्रशही गेला. पारूच्या मृत्यू नंतर रॉबर्ट गिलने ब्रश खाली ठेवून हातात बंदूक घेतली. १८५७ च्या बंडाच्या वेळी गिल पुन्हा फौजेत दाखल झाला, लढला; पण तिथेही त्याच मन रमेना, म्हणून बंड मोडल्या नंतर पुन्हा १८६१ साली त्याने चित्रकलेला वाहून घेतले. १८६४ मध्ये भुसावळ येथे रॉबर्टने अखेरचा श्वास घेतला. याच पारू आणि रॉबर्ट गिलच्या प्रेमकथेवर आधारित २०१३ साली अजिंठा हा चित्रपटसुद्धा बनवण्यात आला होता. (Ajanta Caves)
दरम्यान शेकडो वर्षांचा अज्ञातवास संपून आधुनिक कला जगतात अजिंठ्याच नाव हळूहळू पसरल होत. १८५७ च्या बंडानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात येऊन इंग्रजी अंमल सुरू झाला आणि अजिंठ्याच भाग्य उजळल. एशियाटिक सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला. आज अजिंठा लेणी जागतिक वारसा म्हणून जाहीर झालेली आहे. त्यांनतर मध्यंतरीच्या काळात अजिंठा लेणी हि एलियन्सने बनवली अशा अफवाही पसरल्या होत्या. पण या सर्व अफवांना बाजूला सारून अप्सरा, राण्या, दासी, सामान्य स्त्रिया, राजा, गरीब, संन्यासी, बाल, वद्ध, यक्ष-किन्नर, पशुपक्षी, वृक्ष, फळ, वस्त्राभूषण, चौरस्ते, राजदरबार, वाहन, वापरातील वस्तू यांच दर्शन घडवणारी तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करणारी वास्तविकता आणि कलात्मकता आहे अजिंठा लेण्यांमध्ये ! जगाला प्रेमाचा रस्ता दाखवणाऱ्या गौतम बुद्धांच्या स्वप्नातील दुनिया अजिंठा लेण्यांमुळे आपल्याला पाहायला मिळाली हे विसरून चालणार नाही. त्यामुळे देशाचं सांस्कृतिक वैभव आणि कलेचा अद्भुत आविष्कार असेलली ही अजिंठा लेणी स्वतःमध्येच एक सुंदरता आहे. पण जेव्हा आपण त्यामागची गोष्ट समजून घेता तेव्हा इतिहास आपल्यासाठी आणखी जीवंत होतो इतकंच !