जानेवारीच्या गुलाबी वातावरणात झी मराठीवरील मालिकांमध्येही सध्या प्रेमकहाण्यांना भरतं आलं आहे. यामधली एक प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे, ती म्हणजे ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमधील दिपू आणि इंद्राची प्रेमकहाणी. या मालिकेला आणि त्यातील व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली होती. गेल्या काही दिवसांपासून तर ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली आहे.
‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमध्ये आता रंजक वळणावर आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की, इंद्राने आपल्या मनातील भावना दिपूसमोर व्यक्त केल्या आणि दिपूने इंद्राच्या भावनांचा स्वीकार देखील केला आहे. पण दिपूने अजून तिच्या मनातील इंद्राबद्दलचं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त केलेलं नाहीये.
दुसरीकडे कार्तिक, देशपांडे सरांकडे सानिकाचा हात मागण्यासाठी भेटायला येतो, पण देशपांडे सर त्याची चांगलीच खरडपट्टी काढतात आणि त्याला घरातून हाकलून देतात. त्यामुळे सानिका दुखावली जाते. नाराज सानिका आता घरात कोणाशीच नीट बोलत नाहीये.
सानिकाचं हे वागणं पाहून बाबा मात्र खूप काळजीत आहेत. अशातच ते सानिकासाठी साळगावकरचं स्थळ म्हणून विचार करतायत. साळगावकर हाच इंद्रा आहे याची कल्पना मात्र देशपांडे सरांना नाहीये.
हे ही वाचा: किस्सा महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांच्या रशियन भाषेतील गाण्याचा!
बिगबॉस विशाल निकमचा व्यवस्थापक बनण्याची शिवसेना युवा नेत्याची मागणी
आता दिपूवर जीवापाड प्रेम करणाऱ्या इंद्राचं स्थळ सानिकासाठी सुचवल्यावर काय गोंधळ होणार, हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. सानिका इंद्राच्या प्रेमात पडून, दिपू -इंद्राच्या प्रेमकहाणीमधला अडसर तर बनणार नाही ना? दिपू इंद्रासमोर आपल्या भावना व्यक्त करू शकेल का? या साऱ्या प्रश्नाची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील.