ख्रिसमस आणि नवीन वर्षात (News Year) फिरायला कुठे जायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर गुजरातमधील कच्छ रण उत्सवला नक्की भेट द्यायला हवी. कच्छ (Kachchh) मधील ही पांढरी वाळू पौर्णिमेच्या दिवशी चांदीसारखी लखलखून जाते. या वाळूवर रात्री चांदणे बघण्याची मजा काही औरच असते. कच्छच्या रणामध्ये हा चंद्र, चांदण्यांचा उत्सव बघण्यासोबत गुजरातमधील लोककलाही बघण्याची संधी मिळते. सोबत स्थानिक स्वादिष्ठ पदार्थ आणि उंटाच्या सफारीची मजा घ्यायची असेल तर या कच्छ रण उत्सवाला एकदा तरी भेट द्यायला हवी. डिसेंबर महिन्यापासून सुरु झालेला हा कच्छ उत्सव 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. कच्छमधील वाळवंटात फुलणा-या या उत्सवाला भारतासह परदेशातील पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देतात. यासाठी युनेस्कोने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून घोषित केलेल्या धोर्डो गावात टेंट सिटी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. (Kachchh)
महाराष्ट्रातून या कच्छ उत्सवासाठी पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वे गाड्याही चालू केल्या आहेत. गुजरात मधील कच्छ उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कल्पनेतून चालू झालेल्या या उत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यासाठी कच्छच्या रण जवळ असलेल्या धोर्डो गावात सर्व सुविधांनी युक्त असे टेंट सिटी उभारण्यात येते. या टेंटमध्ये राहून पांढ-या वाळवंटातील चमत्कार आणि कच्छचा समृद्ध सांस्कृतिक वारसा बघता येते. रण उत्सवाची संकल्पना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती. आता या उत्सवानं व्यापक स्वरुप घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2006 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून रण उत्सव सुरू केला. तेव्हापासून कच्छमध्ये रण उत्सव दरवर्षी अधिक व्यापक स्वरुपात होत आहे. कच्छचे पांढरे रण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. विशेषतः या रण उत्सवात पौर्णिमेच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते. पौर्णिमेचा चंद्र आणि आकाशातले हजारो तारे रात्री या कच्छच्या रणमधून बघणे हा विलोभनीय अनुभव असतो. जणू सर्व तारे जमिनीवर उतरले आहेत, असा भास पर्यटकांना होतो. आता जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील पौर्णिमेलाही येथे पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. (Marathi News)
या सर्व पर्यटकांना धोर्डो टेंट सिटीमध्ये राहण्याची व्यवस्था असते. यात पर्यावरणपूरक अशी व्यवस्थापन असते. यावेळी रण महोत्सवात प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. गेल्या वर्षी कच्छमधील धोर्डो गावाला युनेस्कोने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून घोषित केले होते. तेव्हापासून या गावाला भेट देणा-या पर्यटकांची संख्या वाढली आहे. कच्छ उत्सवाच्या काळात ही संख्या दुप्पटीनं वाढते. येथे पर्यटकांना उभारण्यात आलेल्या टेंट सिटीमध्ये एका रात्रीपासून ते चार रात्रीपर्यंतची पॅकेजेस उपलब्ध आहेत.
साधारण 11 हजार रुपयांपासून ही पॅकेजस देण्यात येतात. यात पर्यटक भुज स्टेशनवर आल्यापासून त्यांची काळजी घेण्यात येते. हे पर्यटक भुज स्थानकात परत जाईपर्यंतच सर्व खर्च याच पैशातून केला जातो. यावर्षी भुजपर्यंत वंदे भारत मेट्रोची सेवा चालू झाली आहे. शिवाय पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते भुजपर्यंत विशेष भाड्याच्या सुपरफास्ट गाड्या चालू केल्या आहेत. (Kachchh)
==============
हे देखील वाचा : कैलास पर्वताची थक्क करणारी रहस्ये
कैलास पर्वताची रखवाली करणारा रान समाज…
===============
कच्छ उत्सव म्हणजे, संगीतापासून खाद्यसंस्कृतीपर्यंतचा व्यापक प्रवास आहे. स्थानिक हस्तकला, संगीत आणि नृत्य प्रकारांचे येथे प्रदर्शन करण्यात येते. लोक कलाकार मोठ्या संख्येने कच्छ महोत्सवात येतात आणि पारंपारिक संगीत, नृत्याचे कार्यक्रम सादर करतात. याशिवाय कच्छ महोत्सवात पारंपारिक भरतकाम, टॅटू कला, चामड्याचे काम, मातीची भांडी आदी स्थानिक वस्तू मोठया प्रमाणात विक्रीसाठी येतात. याशिवाय या रण उत्सवात कॅमल शो, हॉट-एअर बलूनिंग सारखे साहसी उपक्रमही आयोजिक केले जातात.
तसेच पॅरामोटरिंग, गोल्फ कार्ट्स, एटीव्ही राइड्स, स्थानिक खाद्यपदार्थ बनवण्याचे वर्ग आदी नव्या गोष्टींचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय या कच्छ रणमध्ये अलिकडे अनेक चित्रपटांचे शुटींग झाले आहे. रण उत्सवादरम्यान येणा-या पर्यटकांना या चित्रपटांच्या शुटींगच्या साईटही दाखवण्यात येतात. तसेच येथे फोटो शुट करण्याची संधीही पर्यटकांना मिळत आहे. एकूण कच्छ रण उत्सव हा रंग, संगीत आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव आहे. भारतासह परदेशातील नागरिकही या उत्सवाला गर्दी करत आहेत. (Marathi News)
सई बने