आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्र म्हणजे नुसता सळसळता उत्साह. नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा नऊ दिवस होतेच. तिचा जागर करत तिचा आशीर्वाद तर घेतला जातो. मात्र यासोबतच नवरात्रीचे अजून एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे गरबा. देवीसमोर नऊ दिवस रात्री गरबा आणि दांडिया खेळाला जातो. यासाठी देखील अनेकांना नवरात्रीची मोठी आतुरतेने प्रतीक्षा असते. नवरात्र आणि गरबा हा खास करून गुजरातमध्ये जास्त प्रचलित आहे. मात्र आता सगळीकडेच ही परंपरा पाळली जाते.
मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे की, नवरात्रीमध्ये देवीसमोर गरबा आणि दांडिया का खेळाला जातो. घागरा, चोळी आणि पारंपरिक दागिने परिधान करून अतिशय जल्लोषात आणि ऊर्जेने हे नृत्यप्रकार केले जातात. गरबा आणि दांडिया या दोन्हींमध्ये फरक आहे. गरबा नृत्य हे देवीची आरती होण्यापूर्वी केले जाते, तर दांडिया नृत्य देवीच्या आरतीनंतर केले जाते. यामुळे गरबा आणि दांडियामध्ये मोठा फरक आहे. गरबा आणि दांडिया या दोन्ही नृत्यांची निर्मिती गुजरातमध्ये झाली आहे.
धार्मिक मान्यतेनुसार ही नृत्ये फक्त नवरात्रीतच केली जातात. हे नृत्य देवी दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यातील नऊ दिवसांच्या युद्धाच्या विजयाचे प्रतिनिधित्व आणि प्रतीक मानले जाते. ज्यामध्ये देवी दुर्गा विजयी झाली होती. त्यामुळे नवरात्रीच्या काळात भक्त गरबा आणि दांडिया करून देवीला प्रसन्न करतात आणि तिचा आशीर्वाद घेतात.
पारपंरिक गरबा नृत्य जर तुम्ही पाहिले असेल तर ते एका जाळीदार मातीचा घट आणि त्यात प्रज्वलीत असणाऱ्या दिव्याभोवती सादर केले जाते. त्या दिव्याला “गर्भदीप” असे म्हणतात. तो घट म्हणजे शरीराचे प्रतीक आणि ज्यामध्ये प्रज्वलीत असणारा दिवा म्हणजे दैवी शक्ती अशी मान्यता आहे. या गर्भदीपाभोवती नृत्य करणे म्हणजे मानवी जीवनातील दैवी शक्तीची उपासना करणे असा होतो. यासाठीच गर्भदीपाच्या जागी मध्यभागी दुर्गामातेची प्रतिमा ठेऊन मगच त्याभोवती नृत्य होते.
=======
हे देखील वाचा : नवरात्राची पहिली माळ – श्री शैलपुत्री पूजन
=======
गरबा करताना वर्तुळ आकारात ठेका धरला जातो. वर्तुळांमध्ये नृत्य सादर केले जाते. हे चक्र म्हणजे काळाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात चक्राला फार महत्त्व आहे. मानवी शरिरात सात चक्र असून ती शरीरातील तांत्रिक केंद्र मानली जातात. गरबा खेळताना महिला तीन टाळ्या वापर करतात त्याबद्दल असे सांगितले जाते की या तीन टाळ्या त्रिदेवाला समर्पित आहेत. पहिली ब्रह्मदेवाला, दुसरी भगवान विष्णूला आणि तिसरी शंभूमहादेवाला असे सांगितले जाते. तीन टाळ्यांच्या कडकडाटात म्हणजे तीनही देवतांचे आवाहन असते.
“गरबा” हा धार्मिक प्रथेचा एक भाग आहे आणि जिथे धार्मिक गोष्टी येतात तिथे अनवाणी राहून कार्य केले जाते. हा तर साक्षात दुर्गा मातेचा जागर आहे, जी आदीशक्ती आहे. समस्त देवता जिच्यापुढे नतमस्तक होतात. तिची उपासना अनवाणी राहून केली जाते. गरबादेखील अनवाणी खेळला जातो.