चीन – तैवान संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. चीनकडून आणि याचा मोठ्या प्रमाणावर प्रोपोगंडा पसरवला केला जात आहे. तैवानच्या अवती भोवती मिलिटरी ड्रिल्स करणे, अमेरिकेला इशारा देणे, त्याचबरोबर युद्धात अमेरिका तैवानच्या बाजूने उतरल्यास, त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील असं सूचित करणे आणि जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र डागणे, हा चीनच्या धोरणाचाच एक भाग आहे. (China – Taiwan Conflict)
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/08/1659699244_J45TQf_china_tainwan-1.jpeg)
चीन – तैवान संघर्ष झाल्यास त्यात तैवानचं रक्षण करण्यासाठी अमेरिका मैदानात उतरेल असं विधान अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष ‘जो बायडेन’ यांनी केलं आहे. हा अमेरिकेच्या धोरणाचा भाग आहे. इथे एक मुद्दा नमूद करायचा म्हणजे अमेरिकेच्या कॉँग्रेसमध्ये ‘तैवान रिलेशन्स ॲक्ट’ पारित झाला आहे. यानुसार चीनने जर तैवानवर हल्ला केला, तर अमेरिका तैवानला शस्त्र साठा पुरवेल अशी तरतूद आहे. पण प्रत्यक्ष युद्धात उतरेल की नाही, याविषयी थोडा संभ्रम आहे. अर्थात सध्याचे अमेरिकी अध्यक्ष बायडेन यांनी अमेरिका या युद्धात तैवानला पाठिंबा देईल, असं विधान केलं आहे.
इथे प्रश्न उपस्थित होतो की, चीन – तैवान युद्धाचे परिणाम काय होतील? सध्या रशिया -यूक्रेन संघर्ष सुरू आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते की काय अशी परिस्थिती आहे. युरोपमध्ये ऊर्जा संकट सुरू आहे. रशियाने युरोपचा वायू पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे युरोपीय देशांचं नुकसान होत आहे. शिवाय अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये आर्थिक रस्सीखेच सुरू आहेच. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या दोन्ही देशांमधली व्यापारी तूट. (China – Taiwan Conflict)
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/08/Russia_Ukraine_War_33204.jpg-795e2.jpg)
आधीच रशिया – युक्रेन संघर्षाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेला भोगावे लागत आहेत, त्यात जर चीन – तैवान संघर्ष सुरू झाला, तर ते परवडण्यासारखे नाही. म्हणजे याचा सगळ्यात नकारात्मक परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. चीनची अर्थव्यवस्था आहे १७ ट्रीलीयन डॉलर्स तर, अमेरीकेची अर्थव्यवस्था आहे २३ ट्रीलियन डॉलर्स… जर चीन – तैवान संघर्ष झाला, तर चीनचा जीडीपी म्हणजे आर्थिक उत्पादन २५ टक्क्याने घटेल. हा आकडा खूपच मोठा आहे. (China – Taiwan Conflict)
तैवानच्या अर्थव्यवस्थेचा विचार करायचा झाल्यास ती आहे ६७० बिलियन डॉलर्स म्हणजे अमेरिका व चीनच्या तुलनेत खूपच कमी. पण याचाही जोरदार फटका तैवानला बसेल. तैवान ‘सेमी कंडक्टर्स’चं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर करत आहे. तैवानच्या अनेक उद्योगाना याचा फटका बसेल.
====
हे देखील वाचा – दक्षिण कोरियाकडून पहिला मून ऑर्बिटर लॉन्च, २०३० पर्यंत चंद्रावर पाठवणार मनुष्य
====
इथे काही अहवालानुसार, पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण विभागानुसार कदाचित चीन पुढील दोन वर्ष तैवान बरोबर युद्ध करणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र इथे एक विरोधाभास आहे, तो म्हणजे, एकीकडे अमेरिकेचं प्रशासन म्हणतंय की, तैवान बरोबर ते युद्धात उतरतील आणि पेंटयागॉन म्हणत आहे की, पुढील २ वर्ष चीन तैवानवर हल्ला चढवणार नाही, म्हणजे नक्की काय समजायचं, याचं उत्तर खुद्द अमेरिकाच देऊ शकेल. एका विचारप्रवाहानुसार चीन – तैवान बरोबर मिलिटरी म्हणजे सैनिकी युद्ध करणार नाही, तर सायबर अटॅक करेल, माहिती युद्ध खेळेल आणि तैवानची आर्थिक कोंडी करेल.
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/08/China-Taiwan-Conflict-China-is-making-big-preparations-after-26-715x375-1.jpg)
या संपूर्ण घडामोडींचा कर्ता करविता धनी आहे चीनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग. याचं कारण म्हणजे २०१३ साली सत्तेत आल्यानंतर चीनच्या ‘वन चायना’ धोरणाला हिरवा कंदील दाखवणारे हे महाशय जिनपिंगच… याआधी चीन – तैवानमध्ये हळूहळू मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होत होते, पण जिनपिंग आल्यानंतर ज्याला ‘अग्रेसिव्ह पॉलिसी’ म्हणता येईल असं धोरण चीनने अवलंबलं. सध्याच्या चीनला तैवान स्वताच्या अधिकाराखाली घ्यायचा आहे आणि ‘एकच चीन’ बनवायचा आहे. (China – Taiwan Conflict)
तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांच्या मते तैवानच्या सामुद्रधुनीत ज्या पद्धतीने चीनचे ‘मिलिटरी ड्रिल’ चालू आहे ते पाहता असं वाटतं की, ही तैवानवर आक्रमण करण्यासाठी केलेली पूर्वतयारीच आहे. अमेरिकेच्या हाऊस स्पीकर असलेल्या ‘नॅन्सी पेलोसी’ यांनी काही दिवासांपूर्वी केलेल्या तैवान दौऱ्याने चीन खवळला आहे आणि अमेरिका आणि तैवानवर दबाव आणणण्यासाठी हर प्रकारे चीनचे प्रयत्न चालू आहेत. पुढच्या काही दिवसातच चीन काय भूमिका घेतो यावर अमेरिकेची भूमिका ठरेल अशी चिन्हे आहेत. शेवटी चीन आणि तैवानमधे युद्ध झाल्यास ते जगाला परवडणारे नाही, एवढंच इथे सांगावसं वाटतं.
या संघर्षाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? (China – Taiwan Conflict and its impact on India)
तैवान चिप्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि सेमी कंडकस्टर्सचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतो. हे सेमी कंडक्टर्स फोन, लॅपटॉप आणि गाड्यांमध्ये वापरले जातात. भारताने २०२० मध्ये २.३८ बिलियन डॉलर्स मूल्य असलेले सेमी कंडक्टर्स तैवानकडून आयात केले. चीन तैवान संघर्षामुळे भारताच्या वाहन उद्योगावर विपरीत परिणाम होतो आहे. भारतातल्या सगळ्या कार उत्पादकाना हीच गोष्ट सतावते आहे. मग ती कंपनी मारुती सुझुकी असो किंवा महिंद्रा.
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/08/हे-गाणं-माझं-आहे....-4-1024x576.png)
महिंद्रा कंपनीच्या गाड्यांचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास त्या गाड्यांना दोन दोन वर्ष ‘वेटिंग पिरियड’ आहे. तसंच चारचाकी गाड्यांमध्ये या इलेक्ट्रॉनिक चिप्स वापरल्या जातात त्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. एकूणच काय तर, या संघर्षाचा भारताच्या इलेक्ट्रॉनिक बाजारावर खूप मोठा विपरीत परिणाम होतो आहे आणि भविष्यातही होऊ शकतो. शेवटी चीन आणि तैवानमधे युद्ध झाल्यास ते जगाला परवडणारे नाही एवढंच इथे सांगावसं वाटतं.(China – Taiwan Conflict)
-निखिल कासखेडीकर