Home » दिलीप वेंगसरकर – भारताचा ‘अनसंग हिरो’

दिलीप वेंगसरकर – भारताचा ‘अनसंग हिरो’

by Team Gajawaja
0 comment
Dilip Vengsarkar
Share

१९७५ च्या क्रिकेट हंगामाची सुरुवात झाली ती मुंबई विरुद्ध शेष भारत यांच्यातील इराणी चषक सामन्याने. या सामन्यात एकनाथ सोलकर तंदुरुस्त नसल्याने एका १९ वर्षाच्या नवोदित फलंदाजाला मुंबईच्या संघात संधी मिळाली. 

सुरुवातीला तीन विकेट्स लवकर पडल्यावर हा युवक मैदानात उतरला आणि पाहता पाहता तो बेदी प्रसन्नाच्या गोलंदाजीवर स्वार झाला. चौकार, षटकारांची आतषबाजी करून त्याने सी. के. नायडूंची आठवण करून दिली आणि भारतीय क्रिकेट विश्वात एका नव्या कर्नलचा उदय झाला. त्याचे नाव दिलीप बळवंत वेंगसरकर. (Dilip Vengsarkar)

या डावाविषयी बोलताना तो म्हणतो की, त्याने काही ठरवून षटकार मारले नव्हते तर, चेंडूच्या मेरीटनुसार तो खेळत होता. या शतकाने त्याला भारतीय संघाची द्वारे खुली झाली. अनुरा तेणेकूनचा श्रीलंका संघ भारताबरोबर अनधिकृत कसोटी मालिका खेळण्यास आला होता. 

श्रीलंकन संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात दिलीपला भारतीय संघात निवडण्यात आले. त्यानंतर दिलीपने मागे वळून पाहिलेच नाही. अशा या भारताच्या सार्वकालिक श्रेष्ठ क्रिकेटपटूंच्या मांदियाळीतील अनमोल रत्नाचा ६ एप्रिल (१९४१) हा वाढदिवस. त्यानिमित्त त्याला शुभेच्छा.

भारत  १९७६ मध्ये  न्यूझीलंड -वेस्ट इंडिजच्या जोड दौऱ्यावर गेला. वेंगसरकरचा या संघात समावेश झाला. ऑकलंड येथील पहिल्या सामन्यात वेंगसरकरने (Dilip Vengsarkar) कसोटी पदार्पण केले ते सलामीचा फलंदाज म्हणून. भारताने ही कसोटी जिंकली.

या कसोटीनंतर वेंगसरकारला संधी मिळाली ती वेस्ट इंडिज विरुद्ध किंग्स्टन जमेका येथील चौथ्या सामन्यात. ही कसोटी म्हणजे ‘बॉडी लाईन’ मालिकेची आधुनिक काळातील पुनरावृत्ती होती. भारताने ४०६ धावांचा पाठलाग करून आदली कसोटी जिंकल्याने लॉईड प्रचंड खवळला होता. त्याने होल्डिंग, रॉबर्ट्स, होल्डर, डॅनियल या वेगवान गोलंदाजांना शरीरवेधी गोलंदाजी करण्याचे आदेश दिले होते. 

याच गोलंदाजांनी अंशुमन गायकवाडला रक्तबंबाळ केले होते. विश्वनाथ, ब्रिजेश पटेल यांची बोटे मोडली. अशा वेळी वेंगसरकर मैदानात उतरला आणि कदाचित तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी खेळून गेला. त्याने ३९ धावाच काढल्या पण त्यात त्याने होल्डिंग आणि कंपनीला हूकचे व पुलचे असे काही फटके लगावले की लॉईडने सुद्धा त्याची तारीफ केली.

भारताने ही कसोटी गमावली कारण त्यांच्याकडे केवळ सहा फिट खेळाडू उरले होते. या दौऱ्याची आठवण सांगताना दिलीप (Dilip Vengsarkar) म्हणतो की, त्या काळी मॅच फी एवढी कमी होती की, तो त्या पैशात फक्त एक कॅमेरा विकत घेऊ शकला.

या दौऱ्यामुळे दिलीप बी कॉमची परीक्षा देऊ शकला नाही. पण भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव प्राध्यापक चंदगडकर यांनी त्याच्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून स्वतंत्र परीक्षेची व्यवस्था केली. दिलीपच्या क्रिकेट कारकिर्दीत श्री चंदगडकर यांचे महत्वाचे योगदान असल्याचे तो आवर्जून सांगतो.

१९७८ पर्यंत दिलीप (Dilip Vengsarkar) सतत संघाच्या आत बाहेर असायचा. १९७८ च्या पाकिस्तान दौऱ्यात तो भारतीय संघात खऱ्या अर्थाने स्थिरावला. या मालिकेत फैजलबादच्या कसोटीत त्याने ८३ धावा काढताना विश्वनाथबरोबर शतकी भागीदारी केली. पण त्याचा खरा दर्जा दिसला तो लाहोरच्या दुसऱ्या कसोटीत. 

सर्फराज, इम्रान, सलीम अल्ताफ यांनी अनुकूल खेळपट्टीवर भारताचे कंबरडे मोडले होते. मोहिंदर अमरनाथ तर हूकचा  फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टंपवर पडला. अशा कठीण प्रसंगी वेंगसरकर ७६ धावांची लाजबाब खेळी खेळून गेला. या खेळीत त्याने नेत्रदीपक ड्राईव्हज मारले. भारताचा डाव १९९ धावात आटोपला होता.

१९७९ च्या मध्याला भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला.यातील दुसरी लॉर्ड्सची कसोटी वेंगसरकरसाठी (Dilip Vengsarkar) टर्निंग पॉईंट ठरली. भारताचा पहिला डाव ९६ धावात गडगडला होता. इंग्लंडने भारतावर ३२३ धावांची आघाडी मिळवली होती. 

पावसाने खराब झालेल्या खेळपट्टीवर दिलीपने अप्रतिम १०३ धावा फाटकावल्या आणि विश्वनाथबरोबर द्विशतकी भागी रचून सामना वाचवला. या डावात त्याने इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांना अनेकदा उंचावरून फाटकावले. हे त्याचे लॉर्ड्सवरील पहिले शतक ज्याचे खूप कौतुक झाले. पण त्यात शतकवीर विश्वनाथ सुद्धा वाटेकरी होता.

पुढे १९८२ च्या इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्च्या दुसऱ्या डावात त्याने १५७ धावा  फाटकावल्या. पण त्यानंतर कपिल देवाने ५५ चेंडूत ८९ फाटकावून दिलीपचे शतक झाकोळून टाकले. १९८३ मध्ये लॉईडचा संघ भारतात आला होता. 

दुसऱ्या दिल्ली कसोटीत वेंगसरकर – गावस्करने शतकी भागीदारी केली. सुनीलने १२१ धावा  काढून ब्रॅडमनच्या २९ शतकांच्या त्यावेळच्या विक्रमाची बरोबरी केली. दिलीपने १५९ धावांची जिगरी खेळी केली. यात त्याने मार्शल, होल्डिंग, डॅनियल, डेव्हिस याना मैदानाच्या सर्व दिशांना चोपून काढले पण गावस्करच्या विक्रमी शतकापुढे वेंगसरकरचे शतक दुर्लक्षिले गेले.

१९७९ मध्ये  पाकिस्तानविरुद्ध दिल्लीलाच ३९०धावांच्या लक्ष्याचा  पाठलाग करताना वेंगसरकरच्या  १४६ धावांमुळे भारत विजयाच्या समीप आला होता आणि थोडा अधिक वेळ हातात असता तसेच बिन्नी,किरमानीने थोडी साथ दिली असती तर तो सामना आपण जिंकला असता.

१९८६ चा इंग्लंडचा दौरा हा सर्वार्थाने वेंगसरकारने गाजवला. लॉर्ड्सची पहिली कसोटी भारताने जिंकली ती दिलीपने पहिल्या डावात काढलेल्या नाबाद १२६ धावांमुळे. हे दिलिपचे लॉर्ड्सवरील तिसरे शतक. शेवटचा फलंदाज मणिंदर खेळायला आला तेव्हा दिलीप शतकाच्या उंबरठ्यावर होता. दिलीपने मणिंदरला नुसते उभे राहण्यास सांगितले आणि दोन्ही बाजूने खेळून स्वतःचे शतक पूर्ण केले.

सुनील सारखा खेळाडू लॉर्ड्सवर कसोटी शतक मारता न आल्याने कायम दुःखी राहिला. यावरून दिलीपच्या तीन शतकांची महती पटते. दिलीपने आठवण सांगितली की, लॉर्ड्सवर सामना जिंकल्यावर लता मंगेशकरांनी संघाला भोजन दिले आणि दिलीपसाठी खास गाजर हलवा व कोल्हापुरी मटण बनवले होते.

लीड्सच्या दुसऱ्या कसोटीत टिपिकल इंग्लिश वातावरणात दिलीपने पहिल्या डावात अर्धशतक व दुसऱ्या डावात नाबाद १०२ धावा  फाटकावून भारताला जवळजवळ एकहाती विजय मिळवून दिला. या त्याच्या खेळीचे नामांकित माजी इंग्लिश खेळाडूंनी खूप कौतुक केले. या डावात त्याने ग्रॅहम डिल्लीला गुडघ्यावर बसून लागवलेला कव्हर ड्राईव्ह केवळ अविस्मरणीय.

१९८६ हे वर्ष दिलिपचे कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष ठरले. याच वर्षात त्याने कटकला फिरकीच्या आखाडा खेळपट्टीवर श्रीलंकेविरुद्ध १६६ धावा काढल्या. दिलीप या शतकाला सर्वोत्तम मानतो.

एवढे पराक्रम गाजवून सुद्धा वेंगसरकरला भारताच्या कप्तानपदाने हुलकावणी दिली. गावस्कर आपल्या मर्जीनुसार कप्तानपद घ्यावयाचा किंवा सोडायचा.पण त्याचा पर्याय म्हणून कपिल देवचा विचार होत असे. वेंगसरकारला कप्तानी उशिरा म्हणजे १९८७-८८ मध्ये मिळाली. वेस्ट इंडिज विरुद्ध कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना त्याने दोन शतके सुद्धा ठोकली. (Dilip Vengsarkar)

१९८९ च्या पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्याने त्याचे कप्तानपद गेले. तसेच परवानगी नसताना स्तंभलेखन केले म्हणून त्याच्यावर कारवाई केली गेली. कसोटीबरोबरच दिलीपने १२५ एक  दिवसीय सामने खेळून त्यातही आपली छाप उमटवली.

१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला फक्त दोन सामने खेळायला मिळाले. वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या दोन्ही सामन्यात सुनीलला वगळण्यात आले होते व त्याच्या जागी दिलीपला खेळवण्यात आले. विंडीजविरुद्धच्या सामन्यात जबड्याला चेंडू लागून तो जखमी झाला होता.

१९८७ च्या विश्वचषकात इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात अन्नातून विषबाधा  झाल्याने तो खेळू शकला नाही आणि त्याचा फटका भारतीय संघाला बसला. विंडीजचा मालकम मार्शल व वेंगसरकारचे (Dilip Vengsarkar) मैदानावरील वैर प्रसिद्ध होते.

१९७८साली कालिचरणचा संघ भारतात आला असताना मार्शलने कसोटी पदार्पण केले. एका कसोटीत मार्शलच्या मते तो आऊट नसताना वेंगसरकरने खोटे अपील केले व पंचानी मार्शलला बाद दिले. तो राग मनात ठेऊन मार्शल नेहमी वेंगसरकरवर आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा करत असे व अनेक वेळा दिलीपची विकेट काढत असे.

दिलीप स्लिपमधील एक चांगला क्षेत्ररक्षक होता. त्याने टिपलेले ७८ झेल याची साक्ष देतात. मी त्याने घेतलेला एक झेल कधीही विसरू शकत नाही. १९७९ च्या मुंबई कसोटीत वासिम राजाचा तो झेल होता. दिलीपबरोबरच विश्वनाथने सुद्धा झेल घेण्यासाठी सूर मारला होता. पण दिलीपने लक्ष विचलित  होऊ न देता तो झेल टिपला.

१९९१ मध्ये हरयाणाविरुद्ध रणजी अंतिम सामन्यात तीन धावांनी झालेला पराभव त्याच्या जिव्हारी लागला व त्यानंतर कित्येक दिवस त्याला झोप लागली नाही, असे तो म्हणतो.

१९९२ मध्ये निवृत्त झाल्यावर त्याने क्रिकेट अकादमी काढली आणि अनेक होतकरू क्रिकेटपटू मुंबई क्रिकेटला दिले. क्रिकेट प्रशासनात सुद्धा त्याने अनेक पदे भूषवली. २००७ साली भारतीय निवड समितीचा अध्यक्ष असताना त्यानेच धोनीला भारतीय टी २० संघाचा कर्णधार म्हणून निवडले. 

द्रविडचा फॉर्म गेल्यामुळे त्याला एक दिवसीय संघातून वगळण्याचे धैर्य दाखवले. त्याने द्रविडला पूर्वकल्पना न देता वगळले म्हणून खूप गदारोळ झाला होता. पण दिलीपने उत्तर दिले की, द्रविडने सुद्धा कप्तानपद सोडण्याचा निर्णय निवडसमितीला न कळवता जाहीर केला होता. वेंगसरकरनेच विराट कोहलीला भारताच्या एक दिवसीय संघात प्रथम निवडले. निवड समितीचा अध्यक्ष म्हणून तो अनेक देशांतर्गत सामन्यांना उपस्थित असे.

======

हे देखील वाचा – क्रिकेटच्या दुनियेतला अवलिया ‘इंजिनियर’!

======

दिलीप (Dilip Vengsarkar) परिपूर्ण फलंदाज होता आणि सर्व प्रकारचे फटके त्याच्या भात्यात होते. मुंबईच्या रणजी संघातील एका खेळाडूने सांगितले की, सरावात तो त्या गोलंदाजाला एका हाताने षटकार ठोकत असे. फ्रंट फूट वर त्याने मारलेले ड्राईव्हस डोळ्याचे पारणे फेडत. दिलीप (Dilip Vengsarkar) परिपूर्ण फलंदाज होता आणि सर्व प्रकारचे फटके त्याच्या भात्यात होते. मुंबईच्या रणजी संघातील एका खेळाडूने सांगितले की, सरावात तो त्या गोलंदाजाला एका हाताने षटकार ठोकत असे. फ्रंट फूट वर त्याने मारलेले ड्राईव्हस डोळ्याचे पारणे फेडत. 

लॉर्ड्सवर त्याची खेळी पाहिलेले प्रेक्षक कधीही त्याला विसरू शकणार नाहीत आणि म्हणूनच लॉर्ड्सचा अनभिषिक्त व एकमेव द्वितीय राजा हीच त्याची ओळख क्रिकेट जगतात कायम राहील कारण लॉर्ड्सवर तीन शतके मारणारा तो इंग्लंडबाहेरील एकमेव फलंदाज आहे. पण तरी सुद्धा त्याला सचिन, सुनील एवढे ग्लॅमर लाभले नाही आणि म्हणूनच तो भारताचा क्रिकेटमधील ‘अनसंग हिरो’ ठरला.

– रघुनंदन भागवत


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.