”हिंदू धर्म परंपरेत होलिकादहन म्हणजे ‘होळी’ सणाला खूपच महत्व आहे. समाजातील अनिष्ट रुढी, कुप्रवृत्ती यांच्याविरुद्ध ‘बोंबाबोंब’ करून त्यांचे होळीत विसर्जन करायची चांगली प्रथा या सणानिमित्त पार पाडली जाते. पहिल्या दिवशी होलिकादहन आणि दुसऱ्या दिवशी ‘धुळवड’ साजरी करून हा सण साजरा केला जातो. वातावरणातील बदलानुसार या सणाच्या काळात उन्हाळ्याचीही चाहूल लागलेली असते त्यामुळे ‘रंगपंचमी’ खेळायलाही आबालवृद्धांना मजा येते.
गेले दोन-अडीच वर्षे ‘कोरोना’ महामारीचे सावंट असल्यामुळे ‘होळी’, ‘धुळवड’ आणि त्यानिमित्ताने केला जाणारा ‘शिमगा’ साजरा केला जात नव्हता. त्यामुळे यावर्षी ‘शिमगा’ साजरा करण्यासाठी साहजिकच लोकांमध्ये अतिउत्साह दिसून येत होता. ‘कोरोना’मुळे असलेले निर्बंध झुगारून अनेक ठिकाणी हा ‘शिमगा’ पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

वास्तविक पाहता ‘कोरोना’च्या काळात निर्बंधामुळे हा ‘शिमगा’ साजरा करता आला नाही ही वस्तुस्थिती असली तरी, राजकीय पक्षांनी त्याची कसर भरून काढली होती. राजकीय नेत्यांच्या सभा, राजकीय पक्षांचे मेळावे पाहता ‘कोरोना’ कोठे आहे, असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडत होता.
‘कोरोना’ च्या काळात देखील विरोधकांवर वार करण्याची एकही संधी राजकीय नेत्यांनी सोडली नाही. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी, न्यूज चॅनेल्सच्या सहकार्याने ‘चावडीवरचे राजकारण’ घराघरांत नेल्यामुळे जनतेला रोजच हा ‘शिमगा’ पाहायला मिळत होता. त्यामध्ये कधीच खंड पडला नाही.
महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून तर या राजकीय ‘शिमगा’ शिगेला पोहोचला आहे. सत्तारूढ आघाडी आणि विरोधी भाजप मध्ये दररोज होणारी ही ‘धुळवड’ पाहून जनतेचीही चांगलीच फुकट करमणूक होत आहे.

====
हे देखील वाचा: नगरपालिका निवडणूका- महाविकास आघाडी आणखी मजबूत?
====
राजकीय नेत्यांकडून परस्परांविरूद्ध केले जाणारे आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून दिले जाणारे आव्हाने-प्रतिआव्हाने पाहून हे राजकीय नेते फक्त ‘शिमगा’ करण्यासाठीच ‘राजकारण’ करीत आहेत, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही. अर्थात चोवीस तास राजकारणच करणाऱ्यांच्या हातातच देशाची सत्तासूत्रे आल्यामुळे हे असेच चालणार हे गृहीतच धरावे लागणार असे दिसते.
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील राजकारण हे निवडणूक आणि ‘सत्ता’ या दोनच गोष्टींभोवती केंद्रित झाल्याचे दिसून येते. येनकेनप्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि ‘सत्ता’ मिळवायची आणि ती ‘सत्ता’ पुन्हा निवडणूक जिंकण्यासाठी राबवायची या दुष्टचक्रात देशातील लोकशाही सध्या सापडली आहे.
निकोप लोकशाहीच्या दृष्टीने ही अतिशय घातक गोष्ट ठरणार आहे मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे सोयरसुतक नाही अशीच सध्याची परिस्थिती आहे. न्यूज चॅनेलवाल्यांना तर कसलाच धरबंद राहिलेला नाही. प्रत्येक बातमीचे ‘राजकारण’ करून त्यांनी या ‘राजकीय शिमग्याला’ हातभार लावण्याचा विडाच उचलला आहे असे वाटते.

एका राजकीय नेत्याची ‘आरोप’ करणारी लाईव्ह पत्रकारपरिषद झाली की, क्षणातच त्या आरोपांचे खंडन करणारी वा प्रतिआरोप करणारी प्रतिस्पर्धी नेत्याची लाईव्ह पत्रकारपरिषद दाखविली जाते. त्यामुळे या ‘राजकीय बोंबा’ जनतेला चोवीस तास ऐकायला मिळत आहेत.
महाराष्ट्रात तर त्याचे प्रत्यंतर रोजच दिसून येते राजकारणाखेरीज जनतेच्या जीवन-मरणाचे असंख्य प्रश्न आहेत मात्र ते या ‘राजकीय शिमग्यात’ कोणालाच दिसत नाहीत वा ऐकू येत नाहीत, ही एका दृष्टीने शोचनीय बाब म्हणावी लागेल.
दररोज होणाऱ्या या राजकीय ‘शिमग्या’मुळे महाराष्ट्रातील राजकारणाने मात्र खालची पातळी गाठली आहे. राजकारण हे शेवटी सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठीच असते हेच ही राजकीय नेतेमंडळी विसरली आहेत की काय, अशी दाट शंका येऊ लागली आहे. राजकीय पक्षांनी आपल्या विचारसरणीला आधीच तिलांजली दिली आहे.
====
हे देखील वाचा: ‘तिसऱ्या आघाडी’ च्या नावाखाली के. चंद्रशेखर राव यांना केंद्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची संधी ?
====
निवडणूक जिंकण्यासाठी अथवा त्यानंतर सत्ता मिळविण्यासाठी कोणते पक्ष कोणत्या पक्षांशी युती करतील याचे ‘ताळतंत्र’ आता राहिलेले नाही. जनतेनेही त्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आता राजकारणात ‘सत्ता मिळविण्यासाठी हपापलेले” आणि ”सत्ता टिकविण्यासाठी आसुसलेले” असे दोनच ‘पक्ष’ राहतात की काय अशी भीती वाटू लागली आहे. तसे झाल्यास या ‘राजकीय बोंबा’ आणखीनच वाढतील आणि जनतेलाही खरा शिमगा संपला तरी राजकारणातील ‘शिमगा ‘ साजरा करताना होणारी ‘बोंबाबोंब’ रोजच पाहायला आणि ऐकायला मिळण्याची सवय लागेल.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)