शरद पवार यांचे पुतणे एवढीच ओळख न ठेवता महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वकर्तृत्व, आक्रमकता, प्रशासनावरील पकड आणि सातत्यपूर्ण कार्यरत राहण्याची वृत्ती यामुळे अजित पवार या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून राजकीय पटलावर उदयास आलेल्या अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार करून राज्याच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. आपल्या फटकळ स्वभावासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अजित पवार यांनी १९९१ पासून राज्याच्या मंत्रिमंडळात एक कार्यक्षम व वजनदार मंत्री म्हणून वेगळे स्थान निर्माण केले आहे.
२२ जुलै १९५९ मध्ये जन्मलेल्या अजित पवारांची राजकीय कारकीर्द बारामतीतूनच सुरू झाली. साखर कारखान्याचे संचालक ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद सांभाळताना त्यांनी आपल्यातील नेतृत्वगुण सिद्ध केले. बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार यांना १९९१ मध्ये काँग्रेसची उमेदवारी मिळाली व ते लोकसभेत पोहोचले. मात्र १९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये शरद पवार संरक्षणमंत्री झाले. त्यांच्यासाठी अजित पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
१९९५ चा अपवाद वगळता ते सातत्याने राज्याच्या मंत्रिमंडळात
शरद पवार लोकसभेवर निवडून आले, तर अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. १९९१ मध्येच सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांचा राज्यमंत्री म्हणून प्रथम मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर १९९५ चा अपवाद वगळता ते सातत्याने राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्याचे मंत्री राहिले आहेत. १९९३ मध्ये मुख्यमंत्री नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यावरून सहा मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यात पद्मसिंह पाटील, पुष्पाताई हिरे यांच्यासोबत अजित पवारांचाही समावेश होता. मार्च १९९३ मध्ये शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९९१ नंतर अजित पवार हे सातत्याने मोठ्या मताधिक्याने बारामती मतदारसंघातून निवडून आले आहेत.
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर अजित पवार यांचे राजकीय वजन वाढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या काळातील नेते म्हणून त्यांनी पक्षबांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली. १९९९ मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले तेव्हा छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाली; पण या वेळी अजित पवार यांच्याकडे हे पद द्यावे अशी इच्छा बहुतेक आमदारांची होती. पवार यांच्याकडे पाटंबधारे खात्याची जबाबदारी आली. त्यानंतर ग्रामीण विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्यांची जबाबदारीही त्यांच्यावर आली.
प्रशासनावर पकड असणारा कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा वचक आहे. पाटबंधारेमंत्री म्हणून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १९९७ ते २००४ या कालावधीत ११ प्रकल्पांसाठी त्यांनी केंद्रीय वधींतवेग प्रकल्पातून ६०३ कोटींचा निधी मिळविला. निर्मल ग्राम, हगणदारीमुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या मोहिमांनाही त्यांनी गती दिली. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढविण्यात अजित पवार यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर आले
सर्व जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वत: पवार यांनी लक्ष घालून जिल्ह्या जिल्ह्यात या पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला. २००४ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर आले. त्यातही पवार यांचा वाटा महत्त्वाचा होता. सातारा आणि पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. पुणे महापालिकेत खासदार सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आणण्यात त्यांचा वाटा होता. कलमाडींना दूर ठेवण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या मदतीने अमलात आलेला ‘पुणे पॅटर्न’ चांगलाच वादग्रस्त ठरला. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हापरिषद आणि बहुतेक सहकारी संस्था अशा संपूर्ण जिल्ह्याचे सत्तास्थान अजित पवार यांच्याकडे एकवटले. जिल्ह्यातील हर्षवर्धन पाटील, अनंतराव थोपटे या नेत्यांना कोंडीत पकडण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्न केला.
२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड होऊन तेच उपमुख्यमंत्री होतील यावर ९९ टक्के आमदारांनी शिक्कामोर्तब केले. मात्र शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर ही जबाबदारी टाकली. अजित पवार यांच्याकडे पुन्हा पाटबंधारे खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर ऊर्जा हे महत्वपूर्ण खातेही त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
आज कोरोनाच्या परिस्थिती मध्ये महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये अजित दादा राज्याचे उप मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्या फळीतील आघाडीचा नेता, कार्यक्षम मंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात अजित पवार यांचे स्थान अढळ आहे