Home » मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतचे परिपत्रक जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतचे परिपत्रक जाहीर

by Correspondent
0 comment
Share

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या पदवी, पदव्युत्तर आणि पदविकाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या बॅकलॉग परीक्षांच्या आयोजनासाठी विद्यापीठाच्या विविध सक्षम प्राधिकरणांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार विद्यापीठाने परिपत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार संबंधित सर्व महाविद्यालयांनी करावयाची कार्यवाही नमूद करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या या परिपत्रकानुसार नियमित परीक्षा या १ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून, बॅकलॉगच्या परीक्षा या २५ सप्टेंबर पासून सुरू केल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षा झाल्या आहेत अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा परत होणार नाहीत. ऑनलाईन थेअरी परीक्षांसाठीचे वेळापत्रक हे लीड महाविद्यालयाने क्लस्टरमधील महाविद्यालयांशी चर्चा करून, क्लस्टरमधील सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा या एकाचवेळी घेतल्या जातील अशा पद्धतीने वर नमूद केलेल्या कालावधीतच घेण्याचे नियोजन केले जाईल.

विद्यापीठ प्राधिकरणांनी ठरविल्याप्रमाणे सर्व थेअरी परीक्षा या बहुपर्यायी प्रश्न (MCQ) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. तसेच सर्व पर्याय शक्य न झाल्यास अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाईन पद्धतीचा वापर करून परीक्षा घेण्यात येतील. सर्व ऑनलाईन थेअरी परीक्षा या ५० गुणांसाठी व १ तासाचा कालावधी देऊन घेण्यात येतील. अंतिम सत्राच्या सर्व थेअरी परीक्षा या १३ मार्च २०२० पर्यंत महाविद्यालयात शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत असतील. विद्यार्थ्यांच्या  तयारीसाठी प्रश्नसंच दिले जातील व सराव परीक्षाही करून घेतल्या जातील.

जे विद्यार्थी काही अपरीहार्य कारणास्तव ऑनलाईन थेअरी परीक्षा देऊ शकणार नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्याविषयी लीड महाविद्यालयामार्फत एकत्रित निर्णय घेण्यात येईल. अंतिम सत्र/ वर्ष किंवा बॅकलॉगचे प्रात्यक्षिक, अहवाल आणि व्हायवा व्होसे बाबत विविध मीटींग्स एप्सच्या माध्यमातून व आवश्यकतेनुसार दूरध्वनीद्वारे मौखिक परीक्षा १५ सप्टेंबर पासून घेण्याच्या सूचनाही विद्यापीठामार्फत देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयातील अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांच्या जवळ परीक्षा देण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सुविधांबद्दलच्या माहितीचे तातडीने संकलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यासाठी मार्गदर्शक नमूना तयार करण्यात आला आहे. परीक्षांच्या सुयोग्य आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे क्लस्टर्स तयार केले असून क्लस्टरमधील एका महाविद्यालयास लीड महाविद्यालय म्हणून जबाबदारी पार पाडावयाची आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा देण्याच्याही सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. थेअरी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात घेण्यात येत असल्याने यात विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मुल्यांकनाची सुविधा देता येणार नसल्याची माहिती प्रत्येक महाविद्यालयांने त्यांच्या विद्यार्थ्यांना देण्याच्याही सूचना विद्यापीठामार्फत देण्यात आल्या आहेत.

‘मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोव्हिड-१९ या साथ आजाराचा प्रादुर्भाव व वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि परीक्षा संबंधित सर्व घटक यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी एखाद्या विद्यार्थ्याकडे आवश्यक तांत्रिक सुविधा नसतील तर त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी व स्वयंमसेवी संस्थांनी सर्वोतोपरी मदत करावी. तसेच परीक्षांच्या कालावधी दरम्यान त्या-त्या क्षेत्रात चांगली इंटरनेट व्यवस्था देण्यासंदर्भात इंटरनेट प्रोवायर्डसना व अखंडीत वीज पुरवठा करावा म्हणून संबंधित सर्व घटकांना विद्यापीठामार्फत विनंती केली जाईल.
 – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.