सध्या आमिर खान (Aamir Khan) त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमामुळे चांगलाच प्रकाशझोतात आहे. मागील जवळपास दोन वर्षांपासून आमिर खान त्याच्या या आगामी सिनेमावर काम करत आहे. अशा परिस्थितीत आमिर खानचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका करणार हे नक्की. एक तर वर्षातून एक सिनेमा करूनही आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका करतात. आता या सिनेमाला तर त्याने दोन अडीच वर्ष दिले आहेत, त्यामुळे हा सिनेमा कसा इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असणार हे पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक आतुर आहेत. आमिर इतकीच प्रेक्षकांनी देखील या सिनेमाची मोठी वाट पहिली असून, आता ११ ऑगस्टला सिनेमा प्रदर्शित होत असल्याने त्याचे फॅन्स आणि सिनेप्रेमी चांगलेच खुश आहेत.
आमिर (Aamir Khan) नेहमीच त्याचे सिनेमे प्रमोट करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतो. त्यामुळे त्याच्या चित्रपटांसोबतच आमिर या सिनेमाचे प्रमोशन कसे करणार हा प्रश्न देखील मीडियामध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये गाजत असतो. आता लाल सिंग चड्ढासाठी आमिर काय कल्पना करतो याकडे सर्वांचे लक्ष असतानाच काही दिवसांपूर्वी आमिर खानने जाहीर केले की, तो २८ एप्रिलला त्याच्या फॅन्सला त्याची ‘कहाणी’ ऐकवणार होता. आता आमिर काय कहाणी ऐकवणार कुठे ऐकवणार आदी अनेक चर्चांना उधाण आले असताना अखेर आमिरने त्याची कहाणी सर्वांना ऐकवली आहे. आमिर खानची (Aamir Khan) कहाणी हे दुसरे तिसरे काही नसून, त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमातील गाणे आहे. एका रेडिओ चॅनेलवर हे गाणे ऑडिओ स्वरूपात प्रदर्शित केले गेले आहे.
आमिर खानने (Aamir Khan) स्पष्ट केले आहे की, ‘लाल सिंग चड्ढा सिनेमातील सर्व गाणी फक्त ऑडिओ स्वरुपातच प्रसिद्ध केली जाणार आहे. कारण गाणी बघण्यापेक्षा जास्त ऐकण्यामध्ये मजा असते. कदाचित हीच या सिनेमासाठी आमिरची प्रमोशनची रणनीती असावी. तर नुकतेच प्रदर्शित झालेले ‘कहाणी’ हे गाणे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून, मोहन कन्नन यांनी गायले आहे. तर गाण्याला प्रितमने म्युझिक दिले असून, हे गाणे जीवनाची कथा व्यक्त करणारे आहे.
=========
हे देखील वाचा – ‘मला कोणत्याही नात्यात येण्याची गरज नाही’, म्हणत बिग बॉस विजेतीने पहिले नाते तुटण्यावर व्यक्त केले दुःख
=========
तत्पूर्वी आमिरने (Aamir Khan) या गाण्याबद्दल सांगितले की, “हे गाणे लाल सिंग चड्ढा चित्रपटाचा आत्मा आहे. आणि या चित्रपटाचा अल्बम माझ्या करिअरमधील सर्वात चांगला अल्बम आहे.” या सिनेमाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले असून, त्यांनी २०१७ साली आलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमाचे दिग्दर्शन केले होते तर तारे जमीन पर साठी सहायक दिग्दर्शन केले होते. या सिनेमात आमिर खानसोबत करीना कपूर खान, मोना सिंग, मानव वीज, नागा चैतन्य आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नागा चैतन्य या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. एका माहितीनुसार या सिनेमात शाहरुख खान आणि सैफ अली खान पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहे.