– श्रीकांत ना. कुलकर्णी
”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर भारतीय राजकारणात सर्वात लोकप्रिय दलित नेते म्हणून बाबू जगजीवनराम (Jagjivan Ram) यांना ओळखले जाते. पाच एप्रिल १९०८ हा त्यांचा जन्मदिवस. नुकतीच त्यांची जयंती साजरी करण्यात आली अर्थातच तुरळक लोकांच्या उपस्थितीत. नव्या पिढीला तर त्यांचे विस्मरण केव्हाच झाले आहे. असे असले तरी एकेकाळी दलित नेते म्हणून भारतीय राजकारणात त्यांचे नाव अग्रस्थानी होते. बाबूजी या टोपण नावाने ते लोकप्रिय होते. बिहारमधील आरा जवळील चांडवा या खेडेगावी एका चर्मकार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणी गरिबीबरोबरच अस्पृश्यतेचेही त्यांनी चटके भोगले. मात्र त्यांचा स्वभाव बंडखोर होता. शाळेत असताना त्यांनी दलित मुलांसाठी वेगळा ठेवलेला पाणी पिण्याचा माठ दोनदा फोडला होता.
पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कामगार क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली. १९२८ मध्ये त्यांनी कोलकत्यात कामगार मेळावा आयोजित केला होता त्याला सुमारे ५० हजार कामगार उपस्थित होते. उपेक्षितांचे नेते म्हणून त्यांचा प्रभाव वाढू लागला त्यामुळे अनेक बड्या नेत्यांचे जगजीवनराम यांच्याकडे लक्ष गेले. १९३५ साली त्यांनी ”ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीग” या संघटनेची स्थापना करून अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ उभारली. दलितांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नव्हते. उलट ते त्यांच्यावर टीका करीत असत. याचा त्यांना काँग्रेसमध्ये गेल्यावर चांगलाच फायदा झाला. काँग्रेसमधील दलितांचे नेते म्हणून ते ओळखले जाऊ लागले. बिहारमधील सासाराम या आपल्या परंपरागत मतदारसंघातून ते अनेकवेळा लोकसभेवर निवडून आले.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९४६ साली पं. जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्या नेतृत्वाखाली जे हंगामी सरकार स्थापन झाले होते त्या मंत्रिमंडळात कामगारमंत्री म्हणून जगजीवनराम यांचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे वय अवघे ३८ वर्षांचे होते सर्वात तरुण मंत्री होण्याचा त्याकाळी त्यांनी मान मिळविला होता. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळापासून ते १९७९ सालापर्यंत म्हणजे तब्बल ३१ वर्षे त्यांनी केंद्रात विविध खात्याचे मंत्रिपद भूषविले आणि भारतीय राजकारणात एक वेगळा विक्रम केला. त्यांचा हा विक्रम आजपर्यंत कोणी मोडला नाही. १९७१ च्या बांगला देश युद्धाच्या वेळी ते इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. मात्र प्रामुख्याने ते गाजले केंद्रीय कृषिमंत्री म्हणून कारण तब्बल दोन टर्म त्यांनी कृषिमंत्रिपद सांभाळले होते.
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी १९७५ साली देशात आणीबाणी जारी केली. आणि त्यानंतर दोन वर्षांनी (१९७७ साली) लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या तोंडावरच ‘काँग्रेसशी एकनिष्ठ’ म्हणून ओळखले जाणारे जगजीवनराम यांनी ऐनवेळी काँग्रेसचा त्याग करून स्वतःचा लोकशाही काँग्रेस नावाचा नवीन पक्ष काढला आणि इंदिरा गांधी यांना जबरदस्त धक्का दिला. त्यांच्या या आकस्मिक खेळीने त्याकाळी इंदिरा गांधी या देखील गांगरून गेल्या होत्या. त्याच निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जगजीवनराम यांचा लोकशाही काँग्रेस पक्ष (Indian National Congress) देखील जनता पक्षात विलीन झाला. (त्यावेळी महाराष्ट्रात सर्वप्रथम राजारामबापू पाटील [राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे वडील] यांनी जगजीवनराम यांना साथ देऊन राज्यात लोकशाही काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती).

१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला प्रचंड यश मिळाले आणि पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. त्यांच्या मंत्रिमंडळात जगजीवनराम संरक्षणमंत्री होते. मात्र सत्तेवर आल्यापासूनच जनता पक्षात सुंदोपसुंदी सुरु झाल्यामुळे मोरारजी देसाई यांचे सरकार दोन वर्षानंतर गडगडले. उत्तर प्रदेशचे नेते चौधरी चरणसिंह यांनी सवतासुभा निर्माण करून जनता पक्ष फोडला आणि स्वतःचा भारतीय लोकदल हा पक्ष पुन्हा स्थापन करून त्यांनी इंदिरा गांधी यांच्या पाठिंब्यावर स्वतःचे सरकार स्थापन केले. त्यावेळी जगजीवनराम यांनीही चरणसिंह यांची साथ केली आणि जनता पक्षाला सोडचिट्ठी देऊन स्वतःचा काँग्रेस (जे. जगजीवनराम) पक्ष स्थापन केला आणि ते चरणसिंह यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान झाले.
त्याकाळात आपले ‘जनता’ सरकार पाडल्यामुळे चिडलेल्या मोरारजी देसाई यांनी जगजीवनराम यांच्यावर, ”त्यांनी गेल्या वीस वर्षात प्राप्तिकर भरलाच नाही” असा सनसनाटी आरोप केला. या आरोपामुळे गांगरून गेलेल्या जगजीवनराम यांनी, घाईघाईने समर्थन करताना, ”आपण प्राप्तिकर भरण्याचे विसरून गेलो होतो” असे उत्तर दिले त्यामुळे त्यांचे आणखीनच हसे झाले. शिवाय त्यांच्या दुर्देवाने चरणसिंह यांचे सरकार सहाच महिने टिकले. त्यानंतर मात्र जगजीवनराम यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. १९८० साली केंद्रात इंदिरा गांधी यांची पुन्हा सत्ता आली मात्र त्यांनी जगजीवनराम यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी राजकीय विजनवासात असतानाच त्यांचे ६ जुलै १९८६ रोजी निधन झाले.

जगजीवनराम यांना दोन मुले होती. सुरेशकुमार आणि मीराकुमारी. यापैकी मीराकुमारी यांनी त्यांचा वारसा पुढे चालविला. सासाराम हा जगजीवनराम यांच्या परंपरागत मतदारसंघ त्यांनी काही वर्षे सांभाळला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात मीराकुमारी या लोकसभेच्या अध्यक्षाही होत्या. स्वातंत्र्यापूर्वीपासून ते स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात दलितांचे नेते म्हणून दीर्घकाळ मंत्रिपद भूषविणारे म्हणून जगजीवनराम यांचे भारतीय राजकारणातील स्थान अढळ आहे.
-श्रीकांत ना. कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)