दी ॲशेस! क्रिकेट विश्वातली सर्वात जास्त चर्चेत असणारी मालिका. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस चालू आहेत. पहिले तीनही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका विजय निश्चित केलेला आहे. इतकी चर्चिली जाणारी ॲशेस मालिका नक्की चालू कधी झाली माहिती आहे? तब्बल १३९ वर्षांपूर्वी! सन १८८२-८३ च्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट सिझनमध्ये ॲशेस मालिकेचा उगम झाला. ॲशेसची ठिणगी मात्र त्यापूर्वी ५-६ महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्येच पडली होती. नेमकं काय झालं? चला, थोडंसं मागे जाऊन बघूया.
१८८२ सालचा ऑगस्ट महिना! ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा यजमान इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना होता. इंग्लंड आणि पावसाचं नातं किती घट्ट आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. ओव्हलवर होणाऱ्या त्या एकमेव कसोटीलाही पावसाने हजेरी लावली. भिजलेल्या खेळपट्टीवर बॅटिंग करणं म्हणजे एक दिव्यं काम. साहजिकच कसोटीचे पहिले तीनही डाव कमी धावसंख्येचे झाले आणि इंग्लंडला जिंकण्यासाठी ८५ धावांचं लक्ष्य मिळालं. ह्यावेळी मात्र इंग्लंडची बॅटिंग चांगली चालू होती. केवळ दोन बॅटर्सच्या मोबदल्यात त्यांनी धावांची पन्नाशी गाठली. इथून पुढे जिंकणं म्हणजे केवळ औपचारिकताच होती. पण त्या नाजूक परिस्थितीतूनही ऑस्ट्रेलियाने जोरदार खेळ करत मॅच खेचून आणली.
विकेट्स जात राहिल्या की धावांना अंकुश लागतोच. प्रत्येक विकेटमागे प्रेशर वाढत गेलं आणि शेवटी इंग्लंडला ७ धावांनी पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अनेकदा दिसून आलेल्या ‘विजिविषु’ वृत्तीची पाळंमुळं आपल्याला १८८२ साली झालेल्या त्या ‘ओव्हल’ कसोटीत सापडतात.
इंग्लंडचा मायदेशात झालेला तो पहिला पराभव इंग्लंड पत्रकार, चाहत्यांच्या जिव्हारी लागणारा होता. इंग्लिश लोक खवचटपणासाठी प्रसिद्ध आहेत तसेच विनोदबुद्धीसाठीही प्रसिद्ध आहेत. इतरांप्रमाणे ते स्वतःवरही तितक्याच छानपैकी क्रूर विनोद करू शकतात.
मायभूमीतल्या पहिल्या पराभवानंतर इंग्लिश मिडियाला आयतं कोलीत मिळालंच होतं. अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची टीका केली. ‘द स्पोर्टिंग टाईम्स’ने अशा आशयाचा मथळा लिहिला की – “ओव्हल कसोटीनंतर इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू झालेला आहे. इंग्लंडमध्ये अंत्यसंस्कार होऊन राख अर्थात ‘ॲशेस’ ऑस्ट्रेलियामध्ये नेली जाईल. चारपाच महिन्यानी इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियाला गेला तेव्हा ह्याच प्रसिद्ध मथळ्याच्या संदर्भाने इंग्लिश कर्णधाराने जाहीर केलं की, “आम्ही ऑस्ट्रेलियाला जाऊन इंग्लिश क्रिकेटच्या ॲशेस परत घेऊन येऊ.”
यथावकाश इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन तथाकथित ॲशेस परत मिळवल्या आणि ॲशेस मालिकेचा जन्म झाला. त्याच दौऱ्यादरम्यान मेलबर्नमध्ये काही महिलांनी इंग्लिश कर्णधाराला एक छोटीशी कुपी भेट दिली. त्या कुपीत स्टंपची राख भरलेली होती असं म्हणतात.
अशीच वर्षं जात गेली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान क्रिकेट सिरीज होत राहिल्या आणि कालौघात ॲशेस मालिका आणि त्या प्रसिद्ध कुपीचं समीकरण जुळत गेलं. मिडिया हाईप, प्रेक्षकांचा प्रतिसाद ह्यामुळे ॲशेस मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसाठी प्रतिष्ठेची गोष्ट झाली. प्रत्यक्ष मालिका किती उत्कंठावर्धक होतात हा विषय अलाहिदा, पण ॲशेसचा कैफ मात्र खेळाडू, चाहते, पत्रकार, निवड समिती ह्या सगळ्या घटकांमधून वाहत जाऊन त्यांना व्यापून टाकतो. एक ॲशेस मालिका खेळाडूंची कारकीर्द घडवणारी किंवा बिघडवणारी ठरवू शकते.
ॲशेसच्या जवळपास १४० वर्षांच्या मोठ्या प्रवासाकडे मागे वळून बघताना दोन मालिकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. १९३२ सालची ऑस्ट्रेलियामधली ‘बॉडीलाईन ॲशेस’ आणि १९४८ ची इंग्लंडमध्ये झालेली पण ऑस्ट्रेलियाने गाजवलेली ‘द इनव्हिंसिबल्स’.
१९३२ सालच्या तरुण आणि तडफदार ब्रॅडमनला रोखलं नाही, तर इंग्लंडला मालिका जिंकणं निव्वळ अशक्य होतं. तशातच इंग्लंडचा कर्णधार डग्लस जार्डीनच्या सुपीक आणि घातक डोक्यात एका भयानक प्लॅन शिजला. ब्रॅडमन त्यातल्या त्यात केवळ वेगवान बाऊन्सर्सला बिचकून खेळतो, असं बऱ्याच जणांचं तेव्हा अनुमान होतं. त्याचा फायदा घेऊन ब्रॅडमन आणि परिणामी ऑस्ट्रेलियन्सना शह द्यायचा जार्डीन आणि कं. चा विचार होता.
सामान्यतः फलंदाजाच्या बरगडीच्या दिशेने शॉर्ट पीच चेंडू टाकले ते खेळणं कठीण असतं. फलंदाजाला सहज हालचाल करता येत नाही, बॅटचा पुरेपूर वापर करता येत नाही, चेंडू खेळायला वेळ कमी मिळतो. सोडून द्यायचा म्हणलं, तर कमालीची चपळाई हवी, नाहीतर डोक्याला लागण्याचा धोका असतो. शिवाय धावा होत नाहीतच. जोडीला जार्डीनने डाव्या बाजूला भरपूर क्षेत्ररक्षकांची फौज उभी केली. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था झालेली. ऑस्ट्रेलियाची कोंडी करण्यात इंग्लिश लोकांना शेवटी यश आलं आणि त्यांनी ती मालिका जिंकली. ब्रॅडमनला थोडीशी वेसण घातली गेली तरीही त्याची मालिकेतली सरासरी ५६ इतकी भारी होती.
इंग्लंडने मालिका जिंकली, मात्र डग्लसच्या व्यूहरचनेचा खूप स्तरांतून निषेध झाला. इतकंच नाही तर खुद्द स्वतःच्या संघातही त्याला विरोधक होते. ऐकून आश्चर्य वाटेल पण त्या विरोधकांमध्ये मूळचे भारताचे पण इंग्लंडकडून खेळलेले नवाब ऑफ पतौडीसुद्धा होते. पहिल्या सामन्यात त्यांनी शतक काढलं, पण कदाचित कर्णधाराला नडल्यामुळे त्यांना दुसऱ्या सामन्यानंतर खेळायला मिळालं नाही.
१९४८ सालच्या ऑस्ट्रेलियाचा संघ हा ‘द इनव्हिंसिबल्स’ म्हणून ओळखला जातो. इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यात ब्रॅडमनच्या ह्या संघाने एकूण ३४ सामने खेळले. त्यातले २५ जिंकले आणि ९ अनिर्णित राहिले. थोडक्यात, संपूर्ण दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने अपराजित राहण्याची जबरदस्त कामगिरी बजावली. तो दौरा म्हणजे सर डॉन ब्रॅडमनचा शेवटचा दौरा.
हे ही वाचा: एका जास्तीच्या रोटीमुळे कपिल देव बनला द्रुतगती गोलंदाज…
ताजमहल, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन विकणारा नटवरलाल (Natwarlal) आहे तरी कोण?
ओव्हल मैदानावर झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यानंतर ‘द डॉन’ निवृत्त झाला. शेवटच्या डावात शंभर सरासरी राखण्यासाठी केवळ ४ धावा करायच्या असताना डॉन मात्र शून्यावर बाद झाला. डॉनची सरासरी ९९.९४ ला स्तब्ध झाली. काही गोष्टी अशा चुटपूट लावून संपतात खऱ्या, पण कदाचित त्यामुळेच अमरत्वाचा पट्टा बांधून घेतात आणि अजरामर बनतात!
– केदार ओक