Home » शब्दांतून चित्र सकरणारा अवलिया

शब्दांतून चित्र सकरणारा अवलिया

by Correspondent
0 comment
Share

गुलजार… नाव ऐकताच ‘एक बार वक्त से, लम्हा गिरा कही वहा दास्ताँ मिली, लम्हा कही नहीं’ पासून ‘सून सून सून दीदी तेरे लीये एक रिश्ता आया है’, किंवा ‘पिया बावरी’ पासून ‘कजरा रे’ पर्यंत कितीतरी गाणी सहज ओठावर येतात. आपल्या शब्दांनी कितीतरी पिढ्यांना नवीन भावविश्व देणारा हा एक अवलिया कलाकार. आज गुलजारांबद्दल लिहायचं कारण म्हणजे, आज त्यांचा ८६वा वाढदिवस.

आपल्या शब्दांनी भारतीयांना कायमचं गुलजार करणाऱ्या या व्यक्तीचं खरं नाव संपूरण सिंह कालरा. १८ ऑगस्ट, १९३४ला आत्ताच्या पाकिस्तानात त्यांचा जन्म झाला. पुढे ते ११ वर्षाचे असताना फाळणीच्या दरम्यान ते भारतात आले , पण फाळणीचे ही दुःख त्यांच्या लिखाणातून आजही दिसून येतं. एस डी बर्मन यांच्या सोबत त्यांनी आपल्या सिनेसृष्टितील कारकिर्दीला सुरुवात केली आणि मग सुरू झाला शब्दांचा, दृश्यांचा आणि भावनांचा सुंदर प्रवास.. तमाम रसिकांसाठी पर्वणीच.
कवी, गीतकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून गेली ६७ वर्ष चित्रपटसृष्टीला अतुलनीय योगदान देणारे गुलजार. एकाच माणसाने एकाच वेळी या सर्व क्षेत्रात काम करणं म्हणजे आश्चर्यचं! त्यातही प्रत्येक कामात अगदी कविता असो, गाणी असो वा चित्रपट त्यांनी त्यांचे निराळेपण जपले.

गुलजारचं हे करू शकतात. ‘गोरा मेरा अंग ले ले’ म्हणत सुरू केलेला प्रवास आज सहा दशकांहून अधिक काळ लोटून गेला तरी अव्याहत पणे सुरू आहे. मानवी मनातील प्रत्येक भवन गुलजारांची लेखणी आपल्यासमोर उलगडते, आणि आपल्याला आपल्या अंतरंगात पाहिला शिकवते. त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची समृद्ध भाषा आणि नेमके शब्द. आणि त्या शब्दांच्या माध्यमातून निराळ्या प्रतिमा, तरल भावना, रोजचं आयुष्य, समाजाचे प्रश्न, निसर्गाची जादू, मनाचे खेळ सारं अगदी बारकाईने टिपून ते आपल्या समोर मांडत.

‘जीने के लिए सोचा ही नहीं दर्द संभालने होंगे, मुस्कुराएँ तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे…’ ‘किंवा सांस लेना भी कैसी आदत है’ म्हणत जीवनाचं गमक अगदी सहज मांडतात. ‘लकिरे है तो रहने दो किसीने रुठकर गुस्से मे शायद खींच दी थी’ म्हणत वास्तवावर ते भाष्य करतात. ‘तेरे जाने से कुछ बदला तो नहीं, रात भी आयी थी, चांद भी था हां मगर, नींद नहीं.’ आयुष्याचं हे सत्य इतक्या कुशलतेने कोण मांडू शकेल? गुलजारांचं ऑल टाईम हीट म्हणजे ‘मेरा कुछ सामान…’ रोजच्या आयुष्यातील अशा कितीतरी आपण अनुभवलेल्या भावना इतक्या सुंदरपणे कोणी शब्दांत गुंफाव्या तर त्या गुलजारांनीच.

‘आपकी आँखो में कुछ मेहके हुए से ख्वाब है’ अशा निराळ्याच पण सुंदर उपमा देण्यात गुलजार माहिर. ‘तुझसे नाराज नाही जिंदगी’ पासून ‘जंगल जंगल फूल खिला है’ ते ‘कजरा रे’ आणि ‘जय हो’ सारखी इतकी वैविध्यपूर्ण गाणी लिहिणारा गीतकार एकमेवाद्वितीयचं. ‘याद है एक दिन मेरे मेज पे बैठे बैठे सिगरेट की डिबीया पर तुमने एक स्केच बनाया था, आकर देखो जरा उस पौधे पर फूल आया है..’ असं शब्दांतून चित्र साकारायची जादू त्यांना अवगत होती.

शब्दांमधून चित्र आणि चित्रांमधून वेगळीच दुनिया उभी करण्याची गुलजारांची खासियत. आजही त्यांच्या चित्रपटातील अनेक फ्रेम्स प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये देखील त्यांचं वेगळेपण कायम दिसून येतं. मेरे अपने, परिचय, मौसम, मीरा, हुतूतू, माचिस, अचानक, अंकुर, खुशबू, किनारा किती नावं घ्यायची. प्रत्येक चित्रपट आणि त्याचा विषय निराळा आहे. फ्लॅशबॅकचा उत्तम वापर करत, माणसाच्या भावनांचं, मानवी नात्यांचं, सामाजिक गुंतागुंतीचं कोणी उत्तम चित्रण करावं तर ते गुलजारांनीच.


गुलजार कालातीत आहेत. आज कितीतरी दशकांनंतर देखील त्यांची गाणी आजच्या काळलाही तितकीच चपखल बसतात. त्यांनी ४०-५० वर्षांपूर्वी लिहीलेली गाणी आजच्या तरुणाईला आपलंसं करतात. आणि येणाऱ्या कितीतरी पिढ्यांना आपलंसं करत राहतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या या अष्टपैलू कलाकारांस वाढदिवसाच्या शुभेच्छा!


रसिक कुळकर्णी


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.