महाड शहरानजीक पाच मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी त्याचबरोबर इमारत दुर्घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न चाललेला असतानाच या इमारत दुर्घटनेमुळे महाडवासीयांना मोठा धक्का बसला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या दुर्घटनेनंतर आमदार रविंद्र चव्हाण यांनी आपल्या पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधून घटनेबाबतची माहिती घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन तातडीने मदत करण्याच्या सूचना रविंद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत.
महाड शहरानजीक असणाऱ्या तारिक गार्डन काजलपुरा कॉर्नर वरील कोसळलेल्या इमारतींबाबत माहिती घेताना या इमारतीला परवानगी देण्यात आली होती का ? अधिकृत आणि नियमांच्या अधीन राहून या इमारतीचे बांधकाम केले होते का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. इमारत दुर्घटनेबाबत रायगड जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करावी आणि या इमारत दुर्घटनेमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे.
त्याचबरोबर महाड येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.